शांताराम मोरे हँट्रीक करणार, भिवंडी ग्रामीणमध्ये महायुतीची कोट्यवधींची विकासकामे
Maharashtra Assembly Election 2024 : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या भिवंडी ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी शिवसेनेचा शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट अशी लढत रंगणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला समजला जातो. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघावर महायुतीचे प्राबल्य आहे. फक्त एक मतदारसंघा समाजवादी पार्टीकडे आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी महायुतीने यावेळी कंबर कसली आहे. यावेळी सर्वच्या सर्व सहा मतदारसंघ महायुतीकडे आणण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सध्या जोरदार तयारी करत आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाने दोन वेळा आमदार असलेल्या शांताराम मोरेंना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शांताराम मोरे यांची विकासकामे
या मतदारसंघात शांताराम मोरे हे 2014 व 2019 असे सलग दोन टर्म आमदार होते. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी या मतदारसंघात 3 लाख 35 हजारांच्यावर मतदार आहेत. गेल्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत शांताराम मोरे यांनी 83 हजार 567 मते घेतली होती. गेल्या पाच वर्षांत शांताराम मोरे यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघात सुमारे दोन हजार कोटींची विकासकामे केल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. महायुतीची ताकद व आ. मोरे यांची विकासकामे पाहता हा मतदारसंघ आ. मोरे यांच्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.
मतविभागणीचा आ. मोरे यांना फायदा
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आ. शांताराम मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव घाटाळ, मनसेचे वनिता कथोरे व अपक्ष उमेदवार स्नेहा पाटील अशी चौरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद या मतदारसंघात जास्त आहे. गेल्या तीन निवडणुकांत हे स्पष्ट दिसले आहे. दुसरीकडे मनसेने 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 39 हजार मते घेतली होती. महायुतीच्या विरोधातील मतांची मनसे व ठाकरे गटात विभागणी होणार असल्याची चिन्हे असल्याने आ. मोरे यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.
शिंदे सरकारचा कोट्यवधींचा निधी
ठाणे जिल्हा हा शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या जिल्ह्याला गेल्या अर्थसंकल्पात तब्बल 1 हजार 154 कोटींचा निधी देण्यात आला. त्यात भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे यांनी सर्वाधिक निधी मिळवत विकासकामांसाठी तब्बल 290 कोटी रुपये पदरात पाडून घेतले. त्या निधीतून भिवंडी ग्रामीणमध्ये रस्ते, पुलाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली गेली. भिवंडी ग्रामीणमध्ये आ. मोरे यांच्या कार्यकाळात रस्त्यांची पक्की कामे झाली हे नाकारून चालत नाही. याच विकासकामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे.
भिवंडीतील 121 खेडी होणार माँडेल व्हिलेज
भिवंडी तालुक्यातील एक गाव कार्बन तटस्थ गाव करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. त्यावर सध्या काम सुरु आहे. याशिवाय भिवंडी तालुक्यातील 121 खेड्यांनाही माँडेल व्हिलेज बनविण्याचे काम सुरु आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये महायुती सरकारने कोट्यवधींचा निधी देत, गेल्या पाच वर्षांत नव्या सुधारणा देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील सुमारे पावणे दोन लाख शेतकरी हे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत. सुमारे लाखभर महिला लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी आहेत. या सर्वांच्या जोरावर महायुतीचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications