आम्हाला लाडकी बहिण योजना नको..!सुरक्षा द्या, बदलापुरातील शालेय मुलीवरील अत्याचारानंतर पालक संतप्त
Badlapur School बदलापुरातील एका चारवर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आता जनक्षोभ उसळला आहे. शाळेविरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे, लोकल मार्गावर आंदोलक आंदोलन करत असून रेल्वेचा खोळंबा झाला आहे. आंदोलक संतप्त असून आम्हाला लाडकी बहिण योजना नको, आम्हाला सुरक्षितता द्या अशा संतप्त प्रतिक्रीया आंदोलक महिलांनी राज्यसरकारकडे व्यक्त केल्या आहेत.
बदलापूर येथे झालेल्या लहानग्या मुलीच्या अत्याचार प्रकरणी रेल्वेरोको आंदोलन सुरु असून त्याचा प्रभाव लोकल वाहतुकीवर झाला आहे. हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे, त्यामुळे ठाणे ते बदलापूर हा लोकलमार्गही सध्या आंदोलनामुळे प्रभावित झाला आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा द्या..
आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ती शिक्षा तातडीने द्यावी. ज्यामुळे अत्याचार करणाऱ्यांवर मोठा बचक बसेल आणि यापुढे कुणाचीही अत्याचार करण्याची हिंमत होणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. अशा वृत्तींना चांगलीच जरब बसावी अशी मागणीही आंदोलकांची आहे. तर दुसरीकडे रेल्वेट्रॅकवरुन आंदोलक हटण्यास तयार नाही.
पोलिसांकडून तक्रार घेण्यास झाली होती टाळाटाळ?
दरम्यान पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यावरुन टाळाटाळ केली होती असा आरोप आता करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सात दिवसानंतर हे प्रकरण आता समोर येत असून तेथील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थिती केलं आहे.
शाळेतील सीसीटीव्ही होते बंद?
ज्या शाळेत मुलीवर अत्याचार झाला. त्या शाळेतील सीसीटीव्ही बंद होते अशी माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे ही मोठी आणि सधन शाळा असूनही तिथं सीसीटीव्ही का बंद होते हा मोठा प्रश्न या अत्याचार प्रकरणानंतर उपस्थित केला जात आहे. तरीही पोलिस इतर
काय म्हणाल्या आंदोलक महिला?
आम्हाला नकोय तुमची लाडकी बहिण योजना. आम्हाला न्याय द्या. आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा. नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना बाहेर काढताना विचार करावा लागेल. रोज आम्ही मुलांना गुड आणि बॅड टच शिकवतो, पण आमच्या मुलांना हे शिकवून उपयोग काय?
लहान लेकरं काय असतात त्या नराधमांना कळत नाही मग मुलांना शिकवून उपयोग काय? पोलिस कुठे जातात, गु्न्हा दाखल करायला गेलो तर पालकांना बाहेर हाकलून लावतात. शाळेतील शिक्षक काय करतात? मुलांना शाळेत कशाला पाठवायचे. दहीहंडीला बॅनर लावणारे, सेलिब्रेटी बोलवणारे लोक कुठे गेले असा सवालही यावेळी आंदोलक महिलांनी केला.
बदलापूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्रप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली."
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर आश्वासन दिलं की, "आरोपीला अटक झाली असून या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होणार आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यास सांगितली असून पोक्सोसह अन्य कलमंही आरोपीवर लावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडलं जाणार नाही.आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करत असून स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर नियुक्त केला जाणार आहे. संस्थाचालकांनी कर्मचारी कामावर ठेवताना पूर्ण चौकशी करायला हवी. या प्रकरणातील संस्थाचालकावरही आम्ही कारवाईचे आदेश दिले आहेत."












Click it and Unblock the Notifications