बदलापूरच्या आरोपीचा मृत्यू झाला पण खटला संपला नाही! संस्थाचालकांबाबत निलम गोऱ्हेंचे मोठे विधान..वाचा
Badlapur Encounter : "बदलापूर लैंगिक कृत्य केल्याचा आरोप असलेला मुख्य संशयित आरोपीचा मृत्यू झाला असला तरी हा खटला संपलेला नाही. हा खटला कोर्टात अजूनही सुरू आहे. त्यामध्ये संस्थाचालक किंवा जबाबदार व्यक्ती दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होऊच शकते." असं मोठं विधान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना नेमकी काय शिक्षा असायला हवी याबद्दलही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याबदद्ल 'वन इंडिया' मराठी ने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये दोन लहानग्या मुलींचं लैंगिक शोषण झालं होतं. यानंतर संतप्त पालकांनी आंदोलन केलं होतं. आता या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेवर कारवाई करण्यात आली आहे. पण या शाळेचे संस्थाचालक आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार आहे का ? असा प्रश्न आम्ही नीलम गोऱ्हे यांना विचारला. त्यावर, मुख्य आरोपीचा मृत्यू झाला असला तरी हा खटला संपलेला नाही. हा खटला कोर्टात अजूनही सुरू आहे. त्यामध्ये संस्थाचालक किंवा जबाबदार व्यक्ती दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होऊच शकते, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
याआधी एका आदिवासी आश्रमशाळेमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती याची आठवण त्यांनी करून दिली.

अक्षय शिंदेच्या बाबतीत जी कारवाई झाली तशी सगळ्याच घटनांमध्ये होऊ शकत नाही. तसा काही कायदा नाही. पण लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जर्मनीमध्ये नुकताच एक कायदा झाला आहे. या कायद्यानुसार लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीचा लिंगविच्छेद केला जातो. त्या माणसाची लैंगिक भावनाच संपून जावी या उद्देशाने त्याला काही इंजेक्शन दिली जातात. पण आपल्याकडे असा कोणताही कायदा नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
लहान मुलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आपल्याकडे पाॅक्सो कायदा आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणं हाही पाॅक्सो कायद्यानुसार गुन्हा आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. समाजातल्या सर्वच लोकांनी आणि यंत्रणांनी याचं गांभिर्य समजून घेण्याची गरज आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुली आणि महिलांनी आपल्या संरक्षणासाठी शस्त्र हातात धरण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. विशेषत: दुर्गम भागांमध्ये जिथे पोलीस संरक्षण मिळणं अशक्य असतं आणि यंत्रणांची मदतही लगेच मिळत नाही अशा ठिकाणी महिलांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे.












Click it and Unblock the Notifications