लाडकी बहीण योजनेची दीड हजारांची रक्कम 3 हजार किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते! वाचा काय म्हणाले CM
CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Mahila Melawa Ratnagiri : "आता राज्याची आर्थिक ताकद वाढत चालली असून, भविष्यात लाडकी बहीण योजनेची दीड हजारांची रक्कम तीन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते. या योजनेसह सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. त्यातून महिलांना लखपती झालेलं पाहायचं आहे." अशी इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज रत्नागिरीत व्यक्त केली.
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी रत्नागिरीतल्या चंपक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.

लाडकी बहिण योजनेवर आज काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'माझी लाडकी बहीण ही योजना सरकारने अतिशय शुद्ध मनाने राबवली आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला काटकसरीने घर चालवतात. त्यांना हातभार लावण्यासाठी ही योजना आणली आहे. महिला सक्षम झाल्या, तरच देश सक्षम होईल. त्यांना दिलेले पैसे अर्थव्यवस्थेत येतील आणि त्या माध्यमातून त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.'
मुख्यमंत्री झाल्यावर जेवढा आनंद त्यापेक्षा आज जास्त
'आता राज्याची आर्थिक ताकद वाढत चालली असून, भविष्यात लाडकी बहीण योजनेची दीड हजारांची रक्कम तीन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते. या योजनेसह सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. त्यातून महिलांना लखपती झालेलं पाहायचं आहे,' अशी इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. 'सगळीकडे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत महिला दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर झाला नाही एवढा आनंद या योजनेचं हे चित्र पाहिल्यावर होत आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
'लाडकी बहिण'साठी 33 हजार कोटींची तरतूद
या योजनेच्या वर्षभराच्या अंमलबजावणीसाठी 33 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही योजना कायमस्वरूपी आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी योजना बंद होणार नाही. आमचं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. आम्ही जे शब्द देतो, ते पाळतो. जे होणार नाही ते बोलत नाही. जे करू शकणार आहोत, तेच बोलतो,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. एका बाजूला या योजनेवर टीका करून, दुसरीकडे विरोधकांकडून योजनेचं श्रेय घेण्याचे प्रकार होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ही योजना महिलांना भावली - आदिती तटकरे
'राज्यातल्या दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची भूमिका महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यात अनेक योजना असल्या, तरी माझी लाडकी बहीण ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचली आणि त्यांना भावली.
अशासकीय कर्मचाऱ्यांनाही लाभ देणारी ही एकमेव योजना आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामुळे ती सर्वांपर्यंत पोहोचली. योजनेचा लाभ थेट महिलांनाच मिळावा, म्हणून संयपक्त खातं चालणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या मानलेल्या तीन भावांनी बहिणींना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीपासून ओवाळणी द्यायला सुरुवात केली,' असं प्रतिपादन महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं.
काय म्हणाले उदय सामंत?
'ही योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला; पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी खरं काय ते दाखवून दिलं आहे. योजनेचा लाभ देण्यात बँकांमुळे अडथळा आला, तर त्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारची ही देशातली पहिली योजना असून, महिला भगिनींनी आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही या पैशांचा उपयोग करावा,' असं पालकमंत्री उदय सामंत या वेळी म्हणाले.












Click it and Unblock the Notifications