अमित शहांनी 'त्या' विजयाच्या अभिनंदन पोस्टमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नाव घेणं टाळलं!
Amit shah post maharashtra zp election 2026 result : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले असले, तरी या विजयानंतर दिल्लीतून आलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फोडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना केवळ भाजप आणि शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) उल्लेख केला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेण्याचे स्पष्टपणे टाळले आहे. यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं?
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने सर्व १२ जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजपला ८, शिवसेनेला ३ आणि पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. या यशानंतर अमित शाह यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, "हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे." मात्र, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले, पण उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाचा साधा उल्लेखही केला नाही.
अमित शहांची एक्सवरील पोस्ट
निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित NDA वर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत NDA मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavisजी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष @RaviDadaChavan जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित NDA वर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत NDA मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा…
— Amit Shah (@AmitShah) February 9, 2026
फडणवीसांचा तातडीचा दिल्ली दौरा आणि विलीनीकरणाच्या चर्चा
याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपमधील संभाव्य विलीनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर हा गोपनीय दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पाठोपाठ सुनेत्रा पवारही दिल्लीला जाणार असल्याने राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे 'भूकंप' होण्याचे संकेत मिळत आहेत.












Click it and Unblock the Notifications