शरद पवारांच्या 4 पिढ्या झाल्या तरी कलम 370 पुन्हा लागू होणार नाही- अमित शहांनी सांगितले ठणकावून
Maharashtra Election 2024, Amit Shaha : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. शुक्रवारी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा पार पडत आहेत. नुकतीच सांगली जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हरियाणासारखाच सुपडासाफ होईल. तर शरद पवार यांच्या 4 पिढ्या झाल्या तरी कलम 370 पुन्हा लागू होणार नाही, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
अमित शहा यांची शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे स्मारक बांधण्याची घोषणा करत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?
अमित शहा म्हणाले की, शरद पवार नेहमीच शेतकऱ्यांचा कैवार घेतात. पण त्यांनी सत्तेत असताना त्यांच्यासाठी काय केले? त्यांनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राला काय दिले? हे सांगावे. याऊलट मोदींनी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याचे काम केले. त्यांनी अवघ्या देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी उघडी केली.
महाराष्ट्रातील जनतेची देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणण्याची इच्छा आहे. देवेंद्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता त्यांचे सरकार महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 पर्यंत वाढवणार आहे. येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात निवडणूक होणार असून, मतदारांनी या प्रकरणी निर्णायक भूमिका घ्यायची आहे, असे ते म्हणाले.
#WATCH | Shirala | #MaharashtraAssemblyElections2024 | Union Home Minister Amit Shah says, "National Conference and Congress party passed a resolution in the J&K assembly to bring back Article 370, that Kashmir is not an integral part of India. Today, I am saying it on the land… pic.twitter.com/UiBjGygnYD
— ANI (@ANI) November 8, 2024
राम मंदिरावरून मविआवर निशाणा
अमित शहा म्हणाले, काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा तब्बल 75 वर्षे भिजत ठेवला. पण मोदींनी अवघ्या 5 वर्षांतच हे मंदिर उभे करून दाखवले. हे मंदिर तयार झाले तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी प्रभु रामचंद्रांच्या दर्शनाला जाणार होते. पण ते अजून अयोध्येला गेले नाहीत. आता हे लोक जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शरद पवार यांच्या 4 पिढ्या आल्या तरी हे शक्य होणार नाही.
शिराळ्याची नागपूजा पुन्हा सुरू होणार
अमित शहा यांनी यावेळी आघाडी सरकारने शिराळा येथील बंद केलेली नागपूजा पुन्हा सुरू करण्याचीही ग्वाही दिली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर येथील बंद झालेली नागपूजा पुन्हा सुरू केली जाईल. बत्तीस शिराळांची नागपंचमी कायद्याचे पालन करत पूर्वीसारखीच होईल. महाविकास आघाडीचे लोक या मंदिराची जमीन वक्फ बोर्डाला देण्याचे काम करतील. पण नरेंद्र मोदी असेपर्यंत मंदिर व मंदिराच्या जमिनीला हात लावण्याची ताकद कुणाचीच होणार नाही. सज्यजित देशमुख यांनी ही पूजा सुरू झाल्यानंतर मला बोलवावे, मी स्वतः नागपुजेला येईल, असे ते म्हणाले.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तर उद्धव ठाकरे आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवतील. शरद पवार आपल्या मुलीला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, काँग्रेसचे डझनभर लोक या पदासाठी कपडे शिवून तयार आहेत. पण भाजपमध्ये असे काहीही होत नाही. आता महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीला मतदान करा व फडणवीस यांना विजयी करा, असे अमित शहा म्हणाले. शहा यांच्या या विधानामुळे महायुतीचे सरकार आले तर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.












Click it and Unblock the Notifications