'आदित्य ठाकरेंची बालिश बुद्धी'; हिंदी सक्ती व 'खान' मुद्द्यावरून या भाजप नेत्याचा ठाकरेंवर घणाघात!
BJP vs Shiv Sena political attack : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आता थेट ठाकरे बंधूंवर व खासकरून उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
साटम यांनी 'मुंबई व्हिजन' कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'मुंबई महापालिका लुटणारे डाकू' म्हणत डिवचले, तर युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर 'बालिश बुद्धी' असल्याची बोचरी टीका केली.

उद्धव ठाकरेंवर 'डाकू' आणि 'रिमोट कंट्रोल'चा वार
महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखत असलेल्या साटम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'मुंबई महापालिका लुटणारे डाकू' असा करत, पालिकेतील कथित गैरव्यवहारांवर बोट ठेवले.
साटम यांनी मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या कारभारावर टीका करताना म्हटले, "मुंबई महानगरपालिकेमध्ये जे २५ वर्षे महापौर राहिले, त्यांचा रिमोट कंट्रोल वेगळीकडेच होता. स्टँडिंग कमिटीचे काम आणि अधिकाऱ्यांच्या बदलीचे अजेंडे देखील कोणीतरी द्यायचे, याचा रिमोट कंट्रोल बांद्रा ईस्टला आहे," असे म्हणत त्यांनी पुन्हा ठाकरेंना लक्ष्य केले.
आदित्य ठाकरेंना 'बालिश बुद्धी' म्हणत हिंदी सक्तीवर प्रश्न
उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर साटम यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. त्यांच्या 'पर्यावरणवादी' भूमिकेवर आणि मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर साटम यांनी टीका केली. "जे स्वतःला पर्यावरणवादी समजतात त्यांनी एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्लांट का केला नाही? महानगरपालिकेमध्ये एवढे पैसे असताना आंतरराष्ट्रीय शहरात एसटीपी प्लांट नाही," असा सवाल साटम यांनी केला.
आरे कारशेड आणि 'बालिश बुद्धी'
साटम म्हणाले, "बालबुद्धी असल्यामुळे आरे कार शेडला विरोध झाला." ही टीका थेट आदित्य ठाकरे यांच्यावर होती. तसेच, 'काही लोकं स्वतःला युवा नेते म्हणून घेतात, पण या युवा नेत्यांनी युवांसाठी काहीच केलं नाही,' असेही त्यांनी म्हटले.
हिंदी भाषेवरून दुटप्पी भूमिका
मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावर साटम यांनी शिवसेना-मनसेवर हल्लाबोल केला. "तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये टाकलं, तुमची मुलं जर्मन आणि इंग्लिश शिकली. मग, तुमचा हिंदीला विरोध का? त्याचबरोबर ही दुटप्पी भूमिका का घेता?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
'खान' मानसिकता आणि मराठी माणसाचा मुद्दा
अमित साटम यांनी भाषणात 'खान' या शब्दाचा वापर करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. "खान ही मानसिकता आहे, पाकिस्तानी झेंडा लावणं, बॉम्बस्फोटमधील आरोपीसोबत प्रचार ही खान प्रवृत्तीची ओळख आहे. त्याचमुळे या मुंबईला खान महापौर नको ही आमची भूमिका आहे," असे अमित साटम यांनी स्पष्ट केले.
मराठी लोकांसाठी कामे होताहेत!
'आधी फक्त मराठी माणसाच्या गप्पा व्हायचा आता कामं होत आहेत' असे म्हणत साटम यांनी सांगितले की, मुंबईतील मराठी टक्का आज ३५ टक्के आहे. "देवेंद्र फडणवीसांनी बीडीडी चाळीचं संपूर्ण काम केलं. आम्ही मराठी तरुणांना नोकऱ्या देत आहोत, स्टार्टअप इंडियामध्ये प्रोत्साहन देतोय. पण काही लोक फक्त मराठी माणसांचा आणि तरुणांचा राजकारणासाठी फायदा घेतात," असा टोला त्यांनी लगावला.
भाजपचे 'मुंबई व्हिजन': रस्ते, शिक्षण आणि ओळख
खड्डे आणि रस्ते
"२१,००० कोटी रुपये खड्ड्यांवर खर्च करून देखील रस्ते तसेच असतात, याची जगभरात चर्चा आहे. पण आमचं सरकार आल्यावर ते सर्व रस्ते आता योग्य पद्धतीने बनले आहोत," असे त्यांनी सांगितले.
मनपा शाळांचे परिवर्तन
"जस इंटरनॅशनल स्कूलमध्ये फॅसिलिटी आहे तशी आम्ही बीएमसी स्कूलमध्ये करू. प्रायव्हेट स्कूलप्रमाणेच महापालिकेच्या शाळा करू," ही भाजपची भूमिका असेल.
मुंबईची वेगळी ओळख
भाजप आपल्या मॅनिफेस्टोमध्ये 'आर्ट अँड कल्चरल डिपार्टमेंट'चा मुद्दा घेणार आहे. "याप्रकारे आम्ही मुंबईची वेगळी ओळख तयार करू."












Click it and Unblock the Notifications