मोठी बातमी: अंबादास दानवेंचा विधान परिषदेतून निरोप; पुनरागमनाचा मार्ग खडतर?
ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. या निमित्ताने विधान परिषदेत आज त्यांचा निरोप समारंभ पार पडला. अंबादास दानवे ऑगस्ट २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर, ऑगस्ट २०२२ मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि विधान परिषदेचे अधिवेशन शुक्रवारी संपत असताना, आज त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अंबादास दानवे हे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात त्यांनी ठाकरे गटाची बाजू अत्यंत हिरीरीने आणि आक्रमकपणे मांडली आहे. आता ते विधान परिषदेत नसल्याने, आगामी काळात ठाकरे गटाला अशा आक्रमक नेत्याची उणीव भासण्याची शक्यता आहे.
अंबादास दानवेंच्या विधान परिषदेतील पुनरागमनाचा मार्ग खडतर?
अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे ते पुन्हा सभागृहात दिसणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाकडून विधान परिषदेत निवडून येणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्याच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेच्या या जागेसाठी निवडणूक होईल. तोपर्यंत अंबादास दानवे यांना वाट पाहावी लागेल.
विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार आहे. मात्र, विधानसभा सदस्यांमधून निवडून येण्यासाठी ठाकरे गटाकडे सध्या केवळ २० आमदारांचे संख्याबळ आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा निवडून येण्यासाठी किमान ४० ते ४५ विधानसभा सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications