एकमेकांच्या छाताडावर बसण्याचं काम महायुतीत सुरु... संजय राऊत यांचा आरोप
Allegations by Sanjay Raut- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र तरीही अद्याप सरकार स्थापन न झाल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आज जोरदार टिका केली. महायुतीत सध्या फक्त एकमेकांच्या छातीवर बसण्याचे उद्योग सुरु आहेत, असा आरोप खा. राऊत यांनी केला.

महायुतीवर केला आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना खा. संजय राऊत म्हणाले, गेल्या विधानसभेची अंतिम तारीख 26 होती. ती उलटून गेलीय. तीन पक्षांच्या महायुतीला सैतानी बहुमत मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाला मित्रपक्ष वगैरे मिळून साधारण 140 जागा मिळाल्या आहेत. तरीही जर राज्याला मुख्यमंत्री मिळत नसेल, तर उपयोग काय? भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे सध्या तंगड्यात तंगडे अडकविण्याचे काम सुरु आहे. एकमेकांच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असा आरोपही खा. राऊत यांनी केला.
वापरा आणि फेका ही भाजपची निती
पुढे बोलताना खा. राऊत यांनी भाजपवरही टिका केली. लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शब्द भाजपने दिला होता, अशा चर्चा होत्या. याबाबत जेव्हा पत्रकारांनी राऊत यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, गरज सरो नी वैद्य मरो ही भाजपची निती आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अनेकांना शब्द दिलेत. पण फक्त वापरा आणि फेकून द्या, ही भाजपची निती आहे, असा आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले, भाजपने फिरवलेल्या शब्दांचे सगळ्यात मोठे बळी म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आहेत. खुलेआम दिलेला शब्द असो नाहीतर बंड दाराआड दिलेला शब्द असो, भाजपने तो कधीच पाळलेला नाही. हा इतिहास आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
भाजप मित्रपक्षांवर डोळे वटारतोय
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना राऊत म्हणाले, भाजपचे दिल्लीतील शूरवीर आहेत त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती चाललीय. यापूर्वी त्या दिल्लीतील शूरांनी डोळे वटारले की महायुतीतील मित्रपक्ष शांत बसत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. जे बंडखोर-भूतं भाजपने तयार केली आहेत. ती भूतंच आता डोळे वटारल्यावरही शांत होत नाहीत. ही भूतं आता थेट मोदी-शहांना आव्हानं देऊ लागली आहेत. ही परिस्थिती आता भाजपच्या हाताबाहेर चालली आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications