महापालिका निवडणुका जवळ! युतीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
राज्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. ठाणे, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या तयारीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सर्वच पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एकहाती निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले असतानाच, राज्यस्तरावर मात्र युती होणार की स्वतंत्र लढायची, यावर सध्या मोठा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त एका महत्त्वपूर्ण वक्तव्याने युतीच्या चर्चेला नवे वळण दिलं आहे.
सभासद नोंदणीला जोर, कार्यकर्त्यांना दिशा
अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकांसाठी तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात किमान दहा लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे, तर नाशिकमध्ये पाच लाख सभासद करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यभरात एक कोटी सदस्य जोडण्याचे लक्ष्य त्यांनी जाहीर केले. या मोहिमेत सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा सहभाग असावा, डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनाही यात सामील करून घ्या, असं आवाहन करत त्यांनी पक्षवाढीवर भर दिला.
"आज जे काही आहोत, ते कार्यकर्त्यांमुळेच"
"आम्ही आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, पण हे सर्व केवळ तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच शक्य झालं," अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावलं. यापुढे स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही महत्त्वाची पदं मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
येत्या काही महिन्यांत २८ महापालिका, २५ जिल्हा परिषद, २८५ पंचायत समित्या आणि अनेक नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने ही खरी लढाई असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
युतीबाबत कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य
युतीबाबत स्पष्ट भूमिका न घेता अजित पवारांनी महत्त्वाचा संकेत दिला. "कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्थानिक पातळीवर युती केली जाईल. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. आपण कुठेही कमी नाही, फक्त प्रयत्न गरजेचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असतो," असं सांगत त्यांनी स्थानिक स्वातंत्र्याला प्राधान्य देण्याचा सूर लावला.
महिला सक्षमीकरणावर भर
महिला कार्यकर्त्यांसाठीही त्यांनी एक आश्वासक भूमिका मांडली. "महिला भगिनींचे मानधन वेळेवर मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिन्याच्या शेवटी आदिती मला फोन करते आणि 'दादा, महिलांना पैसे द्या' असं म्हणते. मग मी तातडीने पैसे पाठवतो," असं म्हणत त्यांनी महिलांप्रती आपली बांधिलकी स्पष्ट केली.
संघटनवाढीचा निर्धार
शेवटी अजित पवार यांनी सांगितलं की, कट्टरवादाला राष्ट्रवादी काँग्रेस कधीही स्वीकारणार नाही. महिला, तरुण, तरुणी, डॉक्टर, वकील अशा विविध वर्गातील नागरिकांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
हे वक्तव्य केवळ एक राजकीय घोषणा नसून आगामी निवडणुकांच्या रणसंग्रामासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज राहावेत, यासाठीचा जोरदार इशारा देखील आहे.












Click it and Unblock the Notifications