ठाकरे बंधूंच्या मोर्चात अजित पवार गट सहभागी होणार? सुनील तटकरे यांनी सांगितलं...
राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी विविध पक्ष रस्त्यावर उतरत आहेत. ५ जुलै रोजी मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संयुक्त नेतृत्वात एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.

मात्र, अजित पवार यांच्या गटाची भूमिका काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
"५ जुलैच्या मोर्चात आमच्या पक्षाचा कोणताही नेता सहभागी होणार नाही," असं स्पष्ट करत सुनील तटकरे यांनी सांगितलं की, "हा विरोधकांचा मोर्चा आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला जर या विषयावर काही मांडायचं असेल, तर आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तो मार्ग शोधू."
शरद पवारांच्या पाठिंब्यावर तटकरे यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या गटाने या मोर्चाला दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, "कोणत्याही नेत्याने वेगळी भूमिका घेतली, तर ती त्यांची स्वतंत्र भूमिका असेल. महायुतीच्या चौकटीत आम्ही निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे कोणाला वेगळा निर्णय घ्यायचा असेल, तर आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही."
ठाकरे बंधूंचा मोर्चा, महत्त्वाची राजकीय घडामोड की नाही?
ठाकरे बंधू एकत्र येत असून, त्यांच्या नेतृत्वात ५ जुलैला भव्य मोर्चा होणार आहे. या मोर्चामुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल का, असा प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाले, "मी या मोर्चाकडे राजकीय चष्म्यातून बघत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, या मोर्चामुळे राजकीय समीकरणं फारशी बदलणार नाहीत, असं मला वाटतं."
अजित पवार गटाने ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभाग न करण्याचा निर्णय घेतल्याने, राज्यातील विरोधकांचे हे आंदोलन संपूर्णपणे गैर-महायुतीचा अजेंडा म्हणून पाहिलं जात आहे. दुसरीकडे, शरद पवार गट आणि ठाकरे बंधूंच्या जवळ येण्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.












Click it and Unblock the Notifications