अजितदादांच्या चितेची आग विझण्यापूर्वीच तटकरेंनी... महायुतीतील नेत्याच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ!
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, आता या दुर्दैवी घटनेभोवती आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. "अजित पवारांच्या स्मशानातील राख अद्याप थंडही झाली नव्हती, तोच सुनील तटकरेंनी सत्तेसाठी वहिनींना मंत्रालयात नेऊन शपथ घ्यायला लावली," अशा शब्दांत कदमांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका करताना म्हटले की, अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केले. शरद पवार पक्षाचा ताबा घेतील, अशी भीती तटकरेंना वाटत होती. त्यामुळेच शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी कोणताही विचार न करता वहिनींना तातडीने पदाची शपथ घ्यायला लावली. किमान दहा दिवस थांबले असते तर काय बिघडले असते? असा सवाल करत हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आणि लाजिरवाणे असल्याचे कदम म्हणाले.
सुनील तटकरे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रामदास कदम पुढे म्हणाले की, "तटकरे हे अत्यंत विश्वासघातकी माणूस आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठे केले, त्यांनाच संपवण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे." अजित पवारांच्या मृत्यूमागे तटकरेंचा हात असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, त्यांनी खळबळजनक विधान केले. "विरोधकांच्या आरोपात तथ्य असू शकते, कारण तटकरे काहीही करू शकतात. ज्यांच्यासाठी मी भाजपाशी भांडलो, त्यांना निवडून आणले, तेच आज माझ्या मुलाला संपवायला निघाले आहेत," असे म्हणत त्यांनी तटकरेंची तुलना भास्कर जाधवांशी केली.
दुसरीकडे, या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून यामागील सत्य देशासमोर येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही लावून धरली आहे. "माझा जिवलग सहकारी गेल्याचे दुःख मोठे आहे, त्यामुळे या प्रकरणातील सत्यता समोर यावी हाच माझा ठाम आग्रह आहे," असे तटकरे यांनी नमूद केले.
एकीकडे अपघाताच्या चौकशीची मागणी होत असताना दुसरीकडे रामदास कदम यांनी केलेल्या या जहरी टीकेमुळे महायुती आणि एकूणच राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications