अजित दादांचा एक बाण तीन काम! दत्तात्रय भरणेंना बढती, माणिक राव कोकाटेंना अभय, तिसरा बाण कोणता? वाचा
Ajit Pawar 3 political benefits in one decision : विधीमंडळ अधिवेशनादरम्यान रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी दणका दिला असून त्यांना आता यापेक्षा कमी महत्वाचे असलेले खाते दिले आहे तर राज्याच्या कृषिमंत्रीपदी आता त्यांचे दुसरे विश्वासू दत्तात्रय मामा भरणे यांना कृषिमंत्री केले आहे. या निर्णयाने दत्तात्रय भरणे जाम खूश झाले आहेत असे सुत्रांचे म्हणणे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम एक केले पण फायदे तीन झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शेतीविषयक चर्चा सुरु होती, त्यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत चर्चेदरम्यान मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत होते, ही बाब व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाली. यानंतर राज्यात एकच संताप व्यक्त झाला व शेतकऱ्यांबद्दल कृषिमंत्री किती गंभीर आहेत याची प्रचितीही जनतेला आली. दरम्यान हाच मुद्दा उचलून विरोधकांनी माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांच्या पक्षासह महायुतीवर हल्ला केला टीकास्त्र सोडत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

राज्याचे कृषिमंत्रीपद माणिकराव कोकाटेंकडून काल ३१ जुलैला काढून घेण्यात आले. एकप्रकारे कोकाटेंसाठी ही समजच आहे. तर त्यांचे हेच पद आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू म्हटले जाणाऱ्या दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात अधिसूचनाही शासनाने काढली आहे.
अजित दादांचा एक बाण तीन काम
कोकाटेंचा राजीनामा घ्या असा अजित पवार यांच्यावर जनतेचा आणि विरोधकांचा दबाव होता. आता हा दबाव झुगारणे शक्य नव्हते. व्हिडिओत कोकाटे चक्क रमीचे पत्ते हलवत असल्याचे साऱ्या जनतेने पाहिले त्यामुळे जनतेची दिशाभूल करता येणार नाही ना जनतेला नाराज करुन चालेल.. हे लक्षात आल्याने अजित पवार यांनी कोकाटेंची खांदे पालट केली.
पहिले काम कोकाटेंना अभय
अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेण्याचे टाळले. त्यांना अभय दिले आणि ही एक संधी दिल्याची चर्चा आहे. एकतर स्वतःच्या पक्षाचा मंत्री वाचवला आणि त्याची संभाव्य नाराजीही टाळली. कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी उलट त्यांना थेट क्रीडामंत्री पद बहाल केले.
दुसरे काम, दत्तात्रय भरणेंची नाराजी दूर
अशी चर्चा होती की, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद दिल्याने दत्तात्रय भरणे हे नाराज होते त्यांना हे पद नको होते याऐवजी दमदार मंत्रीपद हवे होते. आता त्यांना राज्यातील महत्वाचे कृषिमंत्रीपद दिल्याने त्यांना हवे ते मिळाले असल्याची चर्चा आहे. यामुळे भरणे मामांची नाराजी दूर झाल्याचे म्हटले जात आहे.
तिसरे काम जनतेत विश्वास जिंकण्याचा प्रयत्न, विरोधकांना उत्तर
अजित पवारांनी तिसरे महत्वाचे काम केले ते म्हणजे कोकाटेंना कृषिमंत्री पदावरुन हटवले आणि त्यामुळे जनतेत असलेला रोष कमी केला. यामुळे आता जनता, शेतकरी प्रथम कुणाचीही गय केली जाणार नाही आदी मुद्दे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना सांगता येईल. कोकाटेंवर कारवाई करुन त्यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला तर कोकाटेंची खांदेपालट करुन विरोधकांच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.












Click it and Unblock the Notifications