कोण जिंकणार, कोण पडणार? विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विधानभवनात दाखल झाले आहेत. काही आमदारांनी मतदान देखील केले असून महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांची मतं फुटणार असे दावे केले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होत असून कोण जिंकणार, कोण पडणार हे आज सायंकाळी पाच वाजता कळणार आहे.

महायुती, मविआचे आमदार हाॅटेलमध्ये
मते फुटण्याचा दगाफटका तसेच घोडाबाजार टाळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या आमदारांना पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पण आता एकेक आमदार विधासभेत दाखल होत असून मतदानप्रक्रीया सुरु आहे. दोन्ही गटांना आपापले आमदार फुटण्याची भिती वाटत आहे.
महायुतीची मते फुटणार - नितीन राऊत
काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी महायुतीची मते फुटणार असल्याने त्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये कैदी बनवून ठेवल्याचे म्हटले आहे. तसेच आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आमचे 3 उमेदवार विजयी होणार आहे, असे नितीन राऊत यांनी म्हणाले.
आमचे 9 उमेदवार जिंकणार - अतुल भातखळकर
भाजपचे नेते अतूल भातखळकर यांनी दावा केला की, आमचे सर्वच (9) उमेदवार निडवून येणार आहेत. याबाबत आम्हाला विश्वास आहे.
हे उमेदवार डेंजर झोनमध्ये?
जर या निवडणुकीत क्राॅस ओटींग झाली तर त्याचा फायदाही ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञ सांगतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे, शेकापचे (शरद पवार पुरस्कृत) जयंत पाटील, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर किंवा भाजपचे 5 पैकी 1 यांच्यापैकी कोणताही एक उमेदवार पराभूत होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
नार्वेकर व जयंत पाटील यांचे लहानमोठ्या अन्य पक्षांमधील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. खोत, गोरखेंसह भाजपच्या पाचही उमेदवारांची मुख्य भिस्त ही पक्षाकडे असलेल्या 112 मतांवर आहे.
जिंकण्यासाठी हवे प्रत्येकी 23 मते
महाराष्ट्र विधान सभेचे एकूण 278 उमेदवार आहेत. तर विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 23 आमदारांची मते आवश्यक आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे पाच उमेदवार दिले आहेत.
मविआचे 3 उमेदवार मैदानात
महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी आपले 3 उमेदवार दिले आहेत. यात काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवले आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदेंचे प्रत्येकी 2 उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव गर्जे व राजेश विटेकर यांना संधी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने कृपाल तुमाने व भावना गवळी यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत या दोघांचेही तिकीट कापले होते, मात्र या दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे.
छोट्या पक्षांना महत्व
उद्धव ठाकरे गटाकडे फक्त 15 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर जिंकतीलच याची शाश्वती नाही. तरीही उद्धव ठाकरे यांनी एक मोठी खेळी खेळायचे ठरवले आहे. त्यांनी मिलिंद नार्वेकर सारख्या तगड्या आणि प्रचंड जनसंपर्क असलेल्या उमेदवाराला मैदानात उतरवले. यामुळे या निवडणुकीत छोट्या पक्षांना मोठे महत्त्व आले आहे. बहुजन विकास आघाडीची (बविआ) भूमिका या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications