कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात कृषी विभागाच्या सचिवांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात बी-बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी सेवकापासून ते कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी डोळ्यात तेल घालून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
बियाणांच्या योग्य वितरण करण्यासाठी टास्क फोर्स
सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल. बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावी, यासाठी मागील वर्षी प्रमाणे शासनाचा व्हाट्सप क्रमांक 24 तासात सक्रिय करून शेतकऱ्यांना कळवण्यात येईल.
चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई
दुसरीकडे कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.
कुचराई करणारे अधिकारी रडारवर
मागचे वर्ष दुष्काळाचे होते, मात्र यावर्षी पाऊस काळ चांगला होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांना आवश्यक सुविधा योग्य दरात उपलब्ध करून देणे यामध्ये कुचकामी ठरणारे अधिकारी - कर्मचारी हे आमच्या रडारवर राहतील. या विषयाचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल; जर कुणी अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर प्रचलित नियमांच्या पुढे जाऊन कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंडे यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications