उद्धव ठाकरे- चंद्रकांत पाटलांची भेट; युती होण्याच्या चर्चा वाढल्यानंतर फडणवीस म्हणाले, मी असतो..
विधानसभेत महायुतीने प्रचंड यश मिळवले. आता लवकरच महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या सगळ्या गदारोळात आज महायुतीचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यांच्यात काहीवेळ चर्चाही झाली. याच चर्चेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा ठाकरे गट महायुती येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. याच भेटीबाबत आज पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले.

कशामुळे वाढल्या चर्चा
भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित होते. ठाकरेंसोबत आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते. शुभेच्छा देऊन ठाकरे निघाले असताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथं दाखल झाले होते. हे सगळे समोरासमोर आल्यावर मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी? असा प्रश्न विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी मी या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला.
फडणवीसांना विचारला प्रश्न
या भेटीनंतर राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. त्याबाबत काही पत्रकारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती. त्यात फार काही विशेष नाही. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते हा भाबडा विचार आहे. हा भाबडा विचार किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे, असा टोलाही फडणवीसांनी पत्रकारांना लगावला.
लवकरच निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील सुनावणी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्या सुनावणीनंतर निवडणुका जाहीर होणं अपेक्षित आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी आघाडी करुन लढवल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.












Click it and Unblock the Notifications