पंधरा दिवसांपूर्वी मोदींची सहकुटुंब भेट घेतली आणि आता सैफवर हल्ला झाला; संजय राऊत यांनी आणला ट्विस्ट
सैफ अली खानच्या कुटुंबाने १५ दिवसांपूर्वीच मोदींची भेट घेतली होती. पंतप्रधानांनी सैफसोबत एक तास घालवला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला. सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कारही दिलेला आहे. मग पद्मश्री पुरस्कार विजेता जर, महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर, राज्याचे गृहमंत्री काय करतात? हा मोदींसाठी मोठा धक्का आहे, असा आरोप शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी बुधवारी मुंबईत होते. सगळी कायदा सुव्यवस्था त्यांच्या आगत-स्वागताला होती. निवडणूक, शिबिरं यामध्ये महाराष्ट्रातील सरकार याआधीच गुंतून पडलेलं आहे. त्यामुळे सामान्यांसाठी कायदा सुव्यवस्था राहीली कुठे? असा सवाल करत राऊत म्हणाले, घरात-झोपड्यात चोर-दरोडेखोर घुसत आहेत. आता पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या कलाकारावही हल्ला होतोय. राज्याची ९० टक्के सुरक्षा ही आमदार, फुटलेल्या लोकांसाठी वापरली जातेय. गद्दारांना सुरक्षा आहे. मग सामान्यांसाठी सुरक्षा देणार कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हल्ला हा मोदींसाठी धक्का
संजय राऊत म्हणाले, सैफ अली खानने १५ दिवसांपूर्वीच मोदींची सहकुटुंब भेट घेतली होती. त्याला पद्मश्री पुरस्कारही दिलेला आहे. विशेष म्हणजे मोदी मुंबईत असताना मुंबईतल्या कलाकालावर हल्ला झाला. हा मोदींसाठी धक्का आहे. महिलांना रस्त्यावरुन फिरणं कठीण झालं आहे. सामान्यांना जगणं कठीण झालं आहे. महाराष्ट्रातील जनता सुरक्षित नसणं हे सरकारचं अपयश आहे.
मोदींवर केली टिका
संजय राऊत यांनी मोदींनी मुंबईत केलेल्या भाषणावरही टिका केली. राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी मुंबईत मार्गदर्शन करताना म्हणाले की, द्वेष भावना ठेऊ नका. आमदारांना सांगितलं की प्रतिमा जपा... अहो, ज्या पार्टीत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, अजित पवार आहेत, त्यांनी काय प्रतिमा जपावी. मोदींच्या पार्टीनेच या सर्वांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केलेत. आता मोदी त्यांना प्रतिमा जपायला सांगताहेत. हा जोक ऑफ द डे आहे, अशा शब्दात राऊतांनी मोदींवर हल्ला चढवला.












Click it and Unblock the Notifications