राज ठाकरेंच्या अजित पवारांवरील टिकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक; म्हणाली, ते गजनी पिक्चरचे हिरो...
मुंबईत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आज महायुतीच्या विजयावर शंका उपस्थिती केली. आपल्या जोरदार भाषणात त्यांनी थेट अजित पवारांच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवारांवर थेट हल्ला चढवला. राज ठाकरे यांच्या टिकेनंतर मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतेही राज ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण व आनंद परांजपे यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.

काय म्हणाले सुरज चव्हाण?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की, राज ठाकरे यांची परिस्थिती सध्या गजनी चित्रपटातील हिरोसारखी झाली आहे. माझा त्यांना सल्ला आहे की, भाषणाला येताना त्यांनी आपण 2009, 2014, 2019 आणि आता 2024 साली काय वक्तव्ये केली, ती सोबत आणावी. हे त्यांना पुढील काळात भाषणं करताना उपयोगी पडेल. गजनीसारखे ते लगेच विसरतात. टिपणं सोबत असली की त्यांच्या लक्षात राहील. राज ठाकरे यांनी अजित पवारांवर बोलू नये. कारण ते उठ दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत, असे हल्लाही चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले, अजितदादा सकाळी 6 वाजेपासून काम करतात. लोकांमध्ये जाऊन कामे मार्गी लावतात. राज ठाकरेंसारखं दुपारी उठायचं आणि सुपारी घेऊन बोलायचं असं त्यांचं काम नाही.
परांजपे यांचाही पलटवार
अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनीही राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, राज ठाकरे यांची भूमिका कायम बदलणारी राहिली आहे. त्यांचा पक्ष आणि चिन्ह राहिल की नाही, याची चिंता त्यांनी करावी. त्यांना 128 जागा लढवून 1.55 टक्के मतं मिळालीत. त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रातील जनतेला मनसे आणि राज ठाकरेंवर कसलाही भरवसा राहिलेला नाही. विधानसभेत त्यांचा एकही प्रतिनिधी नाही. राज ठाकरे यांची देखील ईडीची चौकशी लागली होती, त्यामुळेच तर त्यांची भुमिका बदलली नाही ना? लोकशाहीत निवडणूक लढल्याशिवाय आपल्या पक्षाची ताकद कळत नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी राज ठाकरेंना दिले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मुंबईत आज मनसेचा मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महायुतीसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, लोकसभेला अजित पवारांचा फक्त एक खासदार निवडून आला. त्यानंतर चार महिन्यांतच अजित पवार गटाचे ४२ आमदार कसे निवडून येतात? हा सगळा प्रकार संशय निर्माण करणारा आहे. राज ठाकरे यांनी अजित पवार गटावर घेतलेल्या संशयामुळे राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झालेले पहायला मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications