लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार का..? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
Update on Ladaki Bahin Yojana- राज्यात पुन्हा एकदा महायुतीने सरकार स्थापन केलं होतं. या सरकार स्थापनेत लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा वाटा आहे. आता सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार व योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळणार, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र आता या चर्चांवर राष्ट्रवादीच्या आमदार व माजी मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का, या प्रश्नावर तटकरे यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरु असलेली चर्चा चुकीची आहे. आम्ही अतिशय योग्य रित्या ही योजना राबविली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाख महिलांच्या अर्जाची व्यवस्थित छाननी करुनच त्या सर्व महिलांना लाभ दिला आहे. या सर्व अर्जांची पडताळणी त्यावेळीच योग्य पद्धतीने झालेली आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
छाननी होणार की नाही?
या अर्जांची छाननी होणार का, या प्रश्नावर तटकरे म्हणाल्या, सर्व अर्जांची छाननी झाली आहे. मात्र एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी करण्यात येईल. मी महिला व बालविकास मंत्री होते, त्यावेळी माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. आता नव्याने काही तक्रारी आल्या असतील तर मला माहीत नाही. मात्र तक्रारी आल्या असतील तर त्या अर्जांची छाननी होईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
लाभार्थ्यांना २१०० रुपये मिळणार का?
लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना सध्या दीड हजार रुपये मानधन दिले जाते. ते २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. आता या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याचे कसब महायुती सरकारला दाखवावे लागणार आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, आम्ही दिलेले २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण केले जाईल. बजेटच्या वेळी तो विचार केला जाईल. आर्थिक स्त्रोतांचा विचार करुन हे सगळे करावे लागेल. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूदही केली जाईल. यापुढेही ज्या महिला निकषात बसतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.












Click it and Unblock the Notifications