शुभांशु शुक्ला यांचं अवकाशात झेपावण्याचं स्वप्न काही काळासाठी लांबणीवर, Axiom-4 मिशन स्थगित
भारतीय वंशाचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अवकाश सफरीचं स्वप्न सध्या थांबलं आहे. 41 वर्षांनंतर पुन्हा एक भारतीय अवकाशात झेप घेणार होता, पण Axiom-4 मिशन काही तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आलं आहे.

हे मिशन आज अमेरिकेच्या फ्लोरिडा येथून प्रक्षेपित होणार होतं, पण स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटमध्ये गळती आढळल्याने उड्डाण पुढे ढकलण्यात आलं.
रॉकेटमधील गळतीमुळे तांत्रिक अडथळा
स्पेसएक्सने दिलेल्या माहितीनुसार, "स्टेटिक फायर चाचणीदरम्यान लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये गळती होत असल्याचं आढळलं. त्यामुळे रॉकेटचं लॉंचिंग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला."
ही गळती पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत आणि सुरक्षा उपायांची खात्री होईपर्यंत मिशन स्थगितच राहणार आहे. लॉंचिंगची नवी तारीख पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
चार अंतराळवीरांचा 14 दिवसांचा मोहिमेचा भाग
Axiom-4 ही खासगी अंतराळ संस्था Axiom Space आणि नासाच्या संयुक्त सहकार्याने राबवली जाणारी मोहीम आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) जाणार होते. शुभांशु शुक्ला यांच्यासोबत इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर सुद्धा या मोहिमेचा भाग आहेत.
शुभांशु शुक्ला - भारताचा अभिमान
उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात 10 ऑक्टोबर 1985 रोजी जन्मलेल्या शुभांशु शुक्ला यांनी सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून पदवी घेतली. 2006 साली त्यांनी भारतीय हवाई दलात भरती होऊन लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली.
त्यांना सुखोई-30 MKI, मिग-29, जगुआर, डोर्नियर-228 अशा अनेक विमानांचा 2000 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी IISc बेंगळुरू येथून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेकचं शिक्षण घेतलं आहे.
गगनयान मोहिमेसाठी भारताची वाटचाल
2019 साली ISRO च्या महत्वाकांक्षी 'गगनयान' योजनेसाठी शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यासह अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि प्रशांत नायर हे देखील या मोहिमेचे प्रशिक्षित अंतराळवीर आहेत. सध्या गगनयान मिशनची प्राथमिक चाचणी प्रक्रिया सुरू असून 2027 पर्यंत ही मोहीम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात झेप घेणारा भारतीय
शुभांशु शुक्ला हे 1984 नंतर अवकाशात झेप घेणारे पहिले भारतीय ठरले असते. याआधी विख्यात अंतराळवीर राकेश शर्मा यांनी सोविएत युनियनच्या इंटरकॉस्मोस कार्यक्रमांतर्गत 'सोयूज टी-11' यानातून अवकाशप्रवास केला होता.
त्यांच्या त्या ऐतिहासिक मोहिमेपासून तब्बल 41 वर्षांनंतर भारत पुन्हा एकदा एका अंतराळवीराच्या माध्यमातून अवकाशात आपली उपस्थिती नोंदवण्याच्या तयारीत आहे.












Click it and Unblock the Notifications