मदीना भीषण अपघातात मोठी अपडेट; 45 भारतीयांचे मृतदेह सौदी अरेबियातच दफन होणार!
Saudi Umrah Bus Accident update : उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियात गेलेल्या ४५ भारतीय नागरिकांचा रविवारी रात्री उशिरा मक्का-मदीना महामार्गावर झालेल्या बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेनंतर एक दुःखद निर्णय घेण्यात आला आहे की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या सर्व नागरिकांचे मृतदेह भारतात परत न आणता, त्यांच्या धार्मिक विधीनुसार सौदी अरेबियातच दफन केले जातील.
सौदी अरेबियातच दफन करण्याचा निर्णय
मृत्युमुखी पडलेले बहुतांश नागरिक तेलंगणा (हैदराबाद) येथील असल्याने, तेलंगणा मंत्रिमंडळाने काल (सोमवारी) निर्णय घेतला की, सर्व मृतांवर त्यांच्या धार्मिक रीतीरिवाजांनुसार सौदी अरेबियातच अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी प्रत्येक मृताच्या कुटुंबातील दोन सदस्यांना सौदी अरेबियाला पाठवले जाणार आहे.

सौदी कायद्याचे बंधन
सौदी अरेबियातील प्रचलित कायद्यानुसार यात्रेकरूंचे मृतदेह मायदेशी परत पाठवणे अत्यंत कठीण असते. हज किंवा उमरा यात्रेला जाण्यापूर्वी यात्रेकरूंना एका घोषणापत्रावर स्वाक्षरी करावी लागते, ज्यात स्पष्ट नमूद असते की, सौदी अरेबियाच्या भूमीवर (मक्का, मदीना किंवा इतरत्र) मृत्यू झाल्यास त्यांचे दफन तिथेच केले जाईल.
भारत सरकारच्या नियमांनुसार, जर एखाद्या गैर-यात्रेकरू भारतीयाचा सौदी अरेबियात मृत्यू झाला, तर मृताच्या कायदेशीर वारसांच्या इच्छेनुसार मृतदेह भारतात आणता येतो किंवा सौदी अरेबियात दफन करता येतो. मात्र यात्रेकरूंच्या बाबतीत नियम वेगळे आहेत.
मृत कुटुंबियांना भरपाई मिळणे कठीण!
या अपघातामुळे पीडितांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक भरपाई मिळणे देखील कठीण आहे. सौदी अरेबिया रस्ते अपघातांसाठी थेट सरकारी भरपाई देत नाही. टँकर चालक किंवा संबंधित कंपनीची चूक असल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले आणि कुटुंबियांनी कायदेशीर दावा दाखल केला तरच भरपाई मिळू शकते. या संपूर्ण प्रक्रियेला अनेक महिने लागू शकतात, ज्यामुळे कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
टँकरची बसला धडक
मक्काहून मदीनाला उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या कडेला उभी असताना, एका वेगाने येणाऱ्या इंधन टँकरने मागून बसला जोरदार धडक दिली. भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) रविवारी रात्री पहाटे १:३० वाजता मदिना पासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुहरस जवळ हा अपघात झाला. अपघातावेळी अनेक प्रवासी झोपलेले असल्याने त्यांना सावरण्याची किंवा वाचण्याची संधी मिळाली नाही.
मृतांची संख्या आणि ओळख
एकूण ४५ भारतीयांचा मृत्यू झाला, ज्यात १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुलांचा समावेश आहे. मृत झालेले बहुतांश लोक हैदराबादचे आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश होता, जे २२ नोव्हेंबर रोजी भारतात परत येणार होते.
एकमेव प्रवासी वाचला!
अपघातातून मोहम्मद अब्दुल शोएब (२४) नावाचा एकच भारतीय नागरिक वाचला आहे, जो ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. शोएबवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे उमराह यात्रेला गेलेल्या भारतीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












Click it and Unblock the Notifications