ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने खेळली दुहेरी चाल! पाकड्यांना पडद्यामागून रसद; अमेरिकेकडून पर्दाफाश!
Pentagon Exposes China's Hybrid War Role Against India : भारताने जेव्हा मे २०२५ मध्ये दहशतवादाविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' पुकारले, तेव्हा जगाला वाटले की हा संघर्ष केवळ भारत आणि पाकिस्तानपुरता मर्यादित आहे. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने आता एक धक्कादायक खुलासा केला आहे.
या अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला केवळ पाकिस्तानच्या सीमेवरच नव्हे, तर चीनच्या छुपे 'ग्रे-झोन' युद्धाचाही सामना करावा लागला होता.

काय होते 'ऑपरेशन सिंदूर'?
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 7 मे ते 10 मे 2025 या कालावधीत 'ऑपरेशन सिंदूर' राबवले.
भारतीय हवाई दल आणि क्षेपणास्त्र दलाने पाकिस्तानमधील ९ प्रमुख दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. अवघ्या चार दिवसांच्या या संघर्षात पाकिस्तानची शस्त्रास्त्रे संपत आली होती आणि त्यांचा मोठा पराभव झाला होता.
चीनची 'ग्रे-झोन' रणनीती: मागून वार!
पेंटागॉनच्या अहवालानुसार, चीनने थेट युद्धात न उतरता पाकिस्तानला तीन मुख्य मार्गांनी मदत केली, जेणेकरून भारतावर दबाव निर्माण करता येऊ शकतो.
रियल-टाइम इंटेलिजन्स
चीनने आपल्या अत्याधुनिक उपग्रह कव्हरेज आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती पाकिस्तानला पुरवली. यामुळे पाकिस्तानला आपले टार्गेट्स ठरवणे सोपे झाले.
माहिती युद्ध
भारताच्या लष्करी दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन मोहिमा राबवल्या.
सायबर आणि राजनैतिक हल्ले
भारताच्या सरकारी यंत्रणांवर सायबर हल्ले करून दबाव निर्माण करणे आणि राजनैतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू सावरून धरणे, अशी दुहेरी चाल चीनने खेळली. चीनने 'पीपल्स लिबरेशन आर्मी' (PLA) थेट मैदानात उतरवली नाही, जेणेकरून जगाला आपला सहभाग सहज नाकारता येईल. यालाच 'प्रॉक्सी सपोर्ट' म्हटले जाते.
चीनने ही रणनीती का स्वीकारली?
पेंटागॉनच्या मते, चीन भारताला आपले सर्वात मोठे धोरणात्मक आव्हान मानतो. भारताची अमेरिकेसोबत वाढती जवळीक चीनला अस्वस्थ करत आहे. त्यामुळे भारताला सीमेवर अडकवून ठेवण्यासाठी चीन पाकिस्तानचा वापर एक "प्रेशर व्हॉल्व्ह" म्हणून करत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेला 'विच्छेदन करार' (Disengagement) हा देखील भारताला अमेरिकेपासून दूर ठेवण्यासाठी चीनने केलेली एक तात्पुरती खेळी होती, असे या अहवालात म्हटले आहे.
भारतासमोर आता दुहेरी आव्हान!
या खुलाशामुळे भारताच्या संरक्षण धोरणापुढे नवीन प्रश्न उभे राहिले आहेत. आता भारताला केवळ पाकिस्तानच्या दहशतवादाशी लढून चालणार नाही, तर चीन आणि पाकिस्तानच्या एकत्रित 'हायब्रिड' आणि 'सायबर' धोक्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. तज्ञांच्या मते, भविष्यातील युद्धे केवळ सीमेवरच नाही, तर माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळातही खेळली जातील.
ऑपरेशन सिंदूर: एक नजर
- कालावधी : ७ मे २०२५ ते १० मे २०२५.
- निमित्त : २२ एप्रिलचा पहलगाम दहशतवादी हल्ला (२६ मृत्यू).
- भारताची कारवाई : पाकव्याप्त भागातील ९ दहशतवादी तळांवर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले.
- परिणाम: पाकिस्तानची मोठी हानी, लष्करी साठा संपल्याने युद्धबंदीची मागणी.












Click it and Unblock the Notifications