मानसरोवर यात्रा सुरू होणार; NSA अजित डोवाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट, काय ठरलं!
NSA Chief Ajit Doval Met Chinese Foreign Minister : भारतीय पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेली मानसरोवर यात्रा पुन्हा पुर्ववत सुरू होणार आहे. कारण, भारतीय सुरक्षा सल्लागार समितीचे चीफ अजित डोवाल यांनी चीनसोबत संवाद साधला असून चीनने देखील केलेल्या करारांवर अंमलजावणी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
चीन दौऱ्यावर असलेले NSA चीफ अजित डोवाल यांनी बुधवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. दोघांमधील भेटीदरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थिरता राखणे आणि 4 वर्षांहून अधिक काळ रखडलेले द्विपक्षीय संबंध पूर्ववत करणे यासह अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आहे. दरम्यान, या भेटीनंतर पुन्हा एकदा मानसरोवर यात्रा सुरू होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या बैठकीनंतर चीनने सांगितले की, भारतासोबत केलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यास ते तयार आहेत. दरम्यान, दोन्ही देशातील नेत्यांची भेट ही सुमारे पाच वर्षानंतर घडली आहे.

चीनचे प्रवक्ते काय म्हणाले?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान माध्यमांशी बोलताना म्हणाले की, चीन प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यास तयार आहे. भारत आणि चीन यांच्यातील 23व्या विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठकीत सहभागी डोभाल आलेले होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमा विवाद सोडवण्यासाठी एक करार झाला होता. यासाठी दोन्ही देशांनी अजित डोवाल आणि वांग यी यांना विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. 2019 नंतर ही पहिलीच वेळ आहे की भारताचा वरिष्ठ अधिकारी चीनला भेट देत आहे. यापूर्वी 2019 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर बीजिंगला गेले होते.
2005मध्ये झालेल्या करारानुसार अंमलबजावणी?
2005 मध्ये सीमाप्रश्नाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींनी मान्य केलेल्या राजकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीमाप्रश्नावर परस्पर स्वीकारार्ह पॅकेज सोडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी दोन्ही बाजूंनी केली आहे. या प्रक्रियेला चालना देण्यासाठी सकारात्मक उपाययोजना केल्या जाणार आहे.
या व्यतिरिक्त भारत आणि चीन या दोन्ही देशांनी विशेष प्रतिनिधींच्या बैठकीची यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी, राजनैतिक आणि लष्करी वाटाघाटींमध्ये समन्वय आणि सहकार्य वाढविण्यास आणि सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठी चीन-भारत कार्य यंत्रणा आवश्यक करण्यास सहमती दर्शविली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही घेतली होती भेट
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चिनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात रिओ दि जानेरो येथे G-20 शिखर परिषदेच्या बाजूला ही चर्चा झाली होती. या चर्चेत दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत करण्याबाबत भर देण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बैठकीत कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, सीमापार नद्यांवर डेटा शेअर करणे, भारत आणि चीन यांच्यातील थेट उड्डाणे आणि मीडिया व्यक्तींच्या परस्पर हालचालींसह अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे. ही भेट 20 नोव्हेंबर 2024 रोजी झाली होती.












Click it and Unblock the Notifications