Iran Israel :इराणवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हटले जाणून घ्या!
Iran Israel War, Pakistan condemns US attacks : इराण इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामध्ये आता अमेरिकेने उडी घेऊन इराणमधील हवाई तळावर हवाई हल्ले करून त्यांचा साठा नष्ट केला. त्यामुळे या युद्धाचे पुढील काळात काय परिणाम होणार, पुढील काळात युद्ध कोणत्या स्थितीवर जाऊन पोहोचेल याची कल्पना देखील आता करणे अवघड आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्लानंतर आता पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. यात त्यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने निवेदनात काय म्हणले?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून इराणच्या तीन प्रमुख अणु तळांवर अमेरिकेने केलेल्या लष्करी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणच्या सार्वभौमत्वावरील हा हल्ला प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका आहे.

हल्ल्यामुळे तणाव वाढेल, प्रादेशिक शांततेला धोका
इराणच्या अणु तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचा भाग आहेत आणि यामुळे या प्रदेशात तणाव आणि हिंसाचार आणखी वाढू शकतो. ही परिस्थिती केवळ मध्य पूर्वच नाही तर संपूर्ण जगाच्या शांतता आणि स्थिरतेसाठी धोकादायक आहे असे पाकिस्तानचे मत आहे.
अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन केले
पाकिस्तानने त्यांच्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले की, या हल्ल्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यावरील असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय नियमांविरुद्ध धोकादायक पाऊल मानावे लागेल.
संवाद आणि राजनैतिकता हाच एकमेव पर्याय!
निवेदनात, पाकिस्तानने सर्व देशांना सामान्य नागरिकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा आदर करण्याचे आणि युद्धासारख्या कृती त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे, विशेषतः मानवाधिकार कायद्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्याच्या संकटावर संवाद आणि राजनैतिकतेद्वारेच तोडगा काढणे शक्य आहे यावर पाकिस्तानने भर दिला आणि त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक मानले आहे.












Click it and Unblock the Notifications