...तर घुसून मारु! भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, परराष्ट्र मंत्री काय म्हटले, 4 मुद्यांत वाचा
India Pakistan conflict S. Jaishankar's warning to Pakistan : भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम जरी थांबला तरीही पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही भारतीयांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला, पण ही गोष्ट इथेच थांबणारी नाही. यापुढे जर पाकिस्तानने कुरापती केल्या तर काय करायचे याचे थेट उत्तर भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सद्या युरोप दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात ब्रुसेल्समध्ये 'पॉलिटिको'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर शाब्दीक आसुड उगारला.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला आणि स्पष्टपणे सांगितले की, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर शत्रूच्या सीमेत घुसून उत्तर दिले जाईल. पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत ते म्हणाले की भारत आता कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करणार नाही. या मुलाखतीतील महत्वाचे चार मुद्दे आपण जाणून घेऊया
1. भारत दहशतवादासोबत जगणार नाही
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत 'आम्ही दहशतवादासोबत जगण्यास तयार नाही असे स्पष्ट केले. यासह निर्वाणीचा इशाराही दिला की, जर पाकिस्तानने पुन्हा एप्रिलसारख्या क्रूर कृत्यांची पुनरावृत्ती केली तर त्याला नक्कीच उत्तर मिळेल.
2. 'गरज पडल्यास पाकिस्तानात घुसून हल्ला'
जयशंकर यांनी दहशवादाच्या मुद्द्याला हात घालत पाकिस्तानला ठणकावले आहे. ते स्पष्टपणे म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानात किती खोलवर लपले आहेत याची आम्हाला पर्वा नाही, गरज पडल्यास आम्ही तिथे जाऊ आणि त्यांचा बंदोबस्त करु. परराष्ट्र मंत्री म्हणाले, की समस्येचे मूळ अजूनही आहे. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा वापर राज्य धोरण म्हणून करणारा देश म्हणून वर्णन केले.
3. पाकिस्तानशी संघर्षाचे कारण अजुनही अस्तित्वात..
भारतात पहलगाम हल्ला झाला आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून खतपाणी घातले जाते. त्यामुळे पाकिस्तानही या हल्ल्याला तितकाच जबाबदार आहे असेही दिसून आले आहे. याच मुद्द्यावर गत संघर्षाची कारणे अजूनही अस्तित्वात आहेत का असे जयंशंकर यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर तुम्ही दहशतवादाबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेला तणावाचे कारण मानत असाल तर हो, ही कारणे अजूनही अस्तित्वात आहेत.
4. लढाई थांबण्याचे कारण
एस. जयशंकर यांनी लष्कराच्या नुकसानीच्या प्रश्नावर स्पष्ट केले की, संबंधित विभाग योग्यवेळी त्याचे उत्तर देईल, परंतु त्यांनी दावा केला की भारताची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे पाकिस्तानी हवाई दलावर जास्त भारी होती. "माझ्यासाठी, राफेलच्या सामर्थ्याचा पुरावा असा आहे की, आम्ही 10 मे रोजी सकाळी पाकिस्तानचे 8 एअरबेस नष्ट केले. म्हणूनच लढाई थांबली." असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानी एअरबेस, रनवे आणि हँगरचे झालेले नुकसान याची गुगलवर उपलब्ध असलेले सार्वजनिक फोटो खात्री देतात.












Click it and Unblock the Notifications