बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे सत्र सुरूच;7 दिवसांत दुसऱ्या हिंदू तरुणाची जमावाकडून अमानुष हत्या
Bangladesh Hindu Youth Beaten to Death : शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील अस्थिरता आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशातच पुन्हा एकदा राजबारी जिल्ह्यात एका २९ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सात दिवसांतील ही दुसरी घटना असून, यामुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अमृत मंडलची मारहाण करून हत्या!
राजबारी जिल्ह्यातील होसेंडंगा गावात बुधवारी रात्री ११:०० वाजताच्या सुमारास अमृत मंडल उर्फ सम्राट या तरुणाला जमावाने पकडले. खंडणी मागितल्याचा आरोप करत स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते. तो काही काळ भारतात राहिल्यानंतर नुकताच मायदेशी परतला होता. २४ डिसेंबरच्या रात्री तो एका घरात गेला असताना "चोर-चोर" असा आरडाओरडा झाल्याने जमाव गोळा झाला आणि ही हिंसक घटना घडली.
दीपूचंद्र दासची हत्या: 'ईश्वरनिंदा'ची अफवा ठरली जीवघेणी
या घटनेच्या अवघ्या काही दिवस आधी, १८ डिसेंबर रोजी ढाकाजवळ दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला दीपूने फेसबुकवर इस्लाम धर्माचा अपमान केल्याची अफवा पसरवण्यात आली होती.
बांगलादेशच्या रॅपिड ॲक्शन बटालियनने (RAB) केलेल्या तपासात दीपूच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.त्याने कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे. अफवेमुळे संतप्त झालेल्या जमावाने कापड कारखान्यात शिरून दीपूला बाहेर ओढले, त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकले. याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराचे कनेक्शन!
बांगलादेशातील हा हिंसाचार केवळ धार्मिक नसून त्याला राजकीय पदरही आहेत. विद्यार्थी नेते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मोठा भडका उडाला आहे.
वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले
हादी यांच्या समर्थकांनी 'द डेली स्टार' आणि 'प्रथम आलो' या दोन प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावली. या वृत्तपत्रांना 'हिंदुत्ववादी' आणि 'भारत समर्थक' ठरवून लक्ष्य करण्यात आले.
भारतविरोधी भावना
उस्मान हादी हे भारतविरोधी विचारांचे नेते मानले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांनी रस्त्यावर उतरून तोडफोड आणि जाळपोळ केली, ज्याचा फटका पुन्हा एकदा हिंदू समाजाला बसला आहे.
मानवाधिकार संघटनांची चिंता
बांगलादेशात सातत्याने हिंदू तरुणांना लक्ष्य केले जात असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ अफवांच्या आधारावर जमावाकडून होणारे हे 'मॉब लिंचिंग' बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे आहे.












Click it and Unblock the Notifications