'नो स्मार्टफोन, नो इंटरनेट'; भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोभाल डिजिटल जगापासून दूर का राहतात?
Ajit Doval News : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना जगातील सर्वात शक्तिशाली आणि अनुभवी गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एक मानले जाते. कठीण प्रसंगात भारताची सुरक्षा रणनीती आखणाऱ्या या 'चाणक्या'बद्दल नुकताच एक थक्क करणारा खुलासा झाला आहे. डोभाल यांनी स्वतः मान्य केले आहे की, ते मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर करत नाहीत.

'भारत मंडपम'मध्ये उलगडले गुपित
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' च्या उद्घाटन प्रसंगी डोभाल बोलत होते. यावेळी तरुणांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या जीवनशैलीतील ही आश्चर्यकारक बाब सांगितली.
जेव्हा त्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, "मी मोबाईल फोन वापरत नाही. मी इंटरनेटवरही अवलंबून नाही. जेव्हा कुटुंबाशी किंवा इतर देशांतील नेत्यांशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक असते, तेव्हाच मी बोलतो. माझ्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी मी संवादाच्या इतर आणि सुरक्षित पद्धती वापरतो, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही."
सायबर सुरक्षेचा धोका आणि बनावट खाती
अजित डोभाल हे डिजिटल जगापासून दूर राहण्यामागे सुरक्षिततेचे मोठे कारण असू शकते. गेल्या वर्षीच, सरकारच्या तथ्य-तपासणी संस्थेने (PIB Fact Check) डोभाल यांच्या नावाचे एक बनावट फेसबुक अकाउंट शोधून काढले होते.
या अकाउंटवरून पाकिस्तानच्या सायबर हल्ल्याबाबत खोट्या चेतावणी दिल्या जात होत्या. त्यावेळी पीआयबीने स्पष्ट केले होते की, डोभाल यांचे कोणतेही अधिकृत सोशल मीडिया अकाउंट नाही. त्यांची गुप्तता हीच त्यांची ताकद आहे.
कोण आहेत अजित डोभाल?
अजित डोभाल यांची ओळख केवळ एक अधिकारी म्हणून नाही, तर भारताचे रक्षक म्हणून आहे. ते १९६८ च्या बॅचचे केरळ केडरचे आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. लष्करी सन्मान असणारे 'कीर्ती चक्र' मिळवणारे ते पहिले आणि सर्वात तरुण पोलीस अधिकारी ठरले.
पाकिस्तानमधील वास्तव्य: त्यांनी अनेक वर्षे पाकिस्तानात 'अंडरकव्हर एजंट' म्हणून काम केले आहे, ज्यामुळे त्यांना शत्रूच्या रणनीतीची सखोल माहिती आहे.
साहसी मोहिमांचे सारथी
१९७१ ते १९९९ या काळात डोभाल यांनी अनेक जटिल मोहिमा फत्ते केल्या आहेत.
१. मिझोरम आणि पंजाब: बंडखोरी मोडून काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
२. आयसी-८१४ अपहरण (१९९९): कंधार विमान अपहरण प्रकरणात दहशतवाद्यांशी वाटाघाटी करणाऱ्या पथकात ते आघाडीवर होते.
३. डोकलाम संघर्ष: चीनसोबतचा डोकलाम वाद मिटवण्यात आणि भारताची सुरक्षा रणनीती मजबूत करण्यात डोभाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
डिजिटल युगात 'अॅनालॉग' राहण्याची शक्ती
आजच्या काळात जिथे प्रत्येक व्यक्ती मोबाईलच्या आहारी गेली आहे, तिथे देशाचे सुरक्षा प्रमुख तंत्रज्ञानापासून सुरक्षित अंतर राखून आहेत. माहितीची गोपनीयता जपण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला हा मार्ग सध्याच्या तरुणाईसाठी एक मोठा धडा आहे. डोभाल यांच्या मते, संवादासाठी केवळ मोबाईलच हवा असे नाही, तर कामाप्रती निष्ठा आणि सुरक्षिततेचे भान महत्त्वाचे आहे.












Click it and Unblock the Notifications