Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi : जाणून घ्या- अजिंक्य शंभूराजांचा पराक्रमी इतिहास!
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025 : छत्रपती संभाजी महाराज यांची 29 मार्च 2025 रोजी तिथी नुसार पुण्यतिथी आहे.. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान म्हणून हा दिवस 'बलिदान दिवस' म्हणून देखील पाळलाल जातो. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बलिदान मास पाळून दररोज महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये त्यांच्या कार्याची व पराक्रमाची गाथा सांगितली जाते. छत्रपती संभाजीराजेंना शंभूराजे देखील प्रेमाने म्हटले जात असे. चला तर शंभूराजांच्या पराक्रमाला उजाळा देऊया अन् त्यांना विनम्र अभिवादन करूया...!
2 वर्षांचे होते तेव्हाच आई सोडून गेली
धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी कायमच राहिलेला आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची ओळख 'छावा' म्हणून केली जाते. ते शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ते 2 वर्षांचे असताना सईबाईंच्या निधनानंतर त्यांचे संगोपन राजमाता मॉसाहेब जिजाबाईंनी केले. लहान वयातच त्यांना रणांगण आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू माता जिजाऊंकडून मिळाले होते.

15व्या वर्षी 13 भाषांमध्ये पारंगत
छत्रपती संभाजी महाराज बालपणापासूनच चाणाक्ष आणि अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व होते. वयाच्या आठव्या वर्षी संभाजीराजेंना एका तहासाठी अंबरच्या राजा जयसिंग यांच्याबरोबर राहण्यास पाठवले गेले. यामागे संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणी समजावी असा शिवाजी महाराज यांचा हेतू होता. पुढे संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मराठी, हिंदी, संस्कृत आणि पोर्तुगीज यांसारख्या 13 भाषांचे ज्ञान आत्मसात केले होते. लहानपणापासून स्वराज्याचे बाळकडू मिळालेले संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते.
1681 मध्ये राज्याभिषेक झाला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे स्वराज्याची सुत्रे आली. 16 जानेवारी इ.स. 1681 रोजी रायगड किल्यावर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला..
संभाजीराजेंनी 120 युद्ध जिंकली
छत्रपती संभाजी महाराज एक कुशल संघटक होते. मराठ्यांच्या 15 पट असणाऱ्या मुघलांशी शंभूरायांनी एक हाती लढा दिली. त्यांनी सुमारे 120 युद्धे लढली. यापैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. त्यांनी 120 युद्धे जिंकली. यामुळे त्यांना अजिंक्य म्हटले जाते.
शंभूराजांना जिवंत पकडले गेले
छत्रपती संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी 1689 च्या सुरवातीला संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने शंभूराज जिवंत पकडण्यात मुघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेण्यात आले.
औरंगजेबाने क्रूरपणे त्यांना मारले
संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजांची भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची प्राणज्योत मालवली..
या पराक्रमी राजाला विनम्र अभिवादन
अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!












Click it and Unblock the Notifications