1984चे ऑपरेशन ब्लू स्टार ही कॉंग्रेसची चूक; राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय होतं मिशन?
Rahul Gandhi on Operation Blue Star 1984 : साधारण पंधरा दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यात त्यांनी 1984 चे ऑपरेशन ब्लू स्टार ही कॉंग्रेसची मोठी चूक होती, असे त्यांनी मान्य केले. राहुल गांधींना यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी कॉंग्रेसने केलेल्या चुकीची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे, असे विधान केले.
त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यावर आता भाजपकडून देखील टीका होऊ लागली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी तर राहुल गांधींवर आता विदेशातही टीका होऊ लागली आहे, असा निशाणा साधला. दरम्यान, राहुल गांधी यांनी ज्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारविषयी विधान केले, ते नेमकं काय आहे. कॉंग्रेसने ब्लू स्टार ऑपरेशनमध्ये काय केले होते, याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे. चला तर त्यावर आपण एक नजर टाकूया... !

भारतीय सैन्याने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून ऑपरेशन ब्लू स्टार फत्ते केलं होतं. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती. या हिंसेला हवा देण्याचं काम 'दमदमी टकसाल'चे जनरल सिंग भिंडरावाले यांनी केलं होतं.
पंजाबमधील हिंसा, खलिस्तानी चळवळीने निर्माण केलेला उच्छाद मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला करण्यास आदेश दिले होते. पुढे त्यांच्या हत्येने देशाला त्याची किंमतही मोजावी लागली. त्यामुळे पंजाबचा इतिहास लिहिताना ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या या गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात.
'ऑपरेशन सनडाऊन', नंतर 'ऑपरेशन ब्लू स्टार'
केंद्र सरकारने पंजाबमधील हिंसक घटना रोखण्यासाठी 1984 मध्ये 'ऑपरेशन ब्लू स्टार'च्या माध्यमातून सैन्य कारवाईचा धोरण आखले. सुरुवातीला 'ऑपरेशन सनडाऊन' अंतर्गत कारवाई करण्याचे ठरले.
त्यासाठी 200 कमांडोंना ट्रेनिंग दिले गेले. मात्र, या ऑपरेशनमुळे अधिक लोकांना नुकसान होऊ शकतं हे लक्षात आल्याने हे ऑपरेशन रद्द केले गेले. त्यानंतर 1 जून 1984 ला केंद्र सरकारने 'ऑपरेशन ब्लू स्टार'चा प्रारंभ केला.
नेमकं जून महिन्यात काय झालं होतं?
काही अहवालानुसार, 2 जून रोजी 1984 हर मंदिर साहेब परिसरात हजारो श्रद्धाळू आले होते. कारण 3 जून रोजी गुरू अर्जुन देव यांचा शहीद दिन होता. त्याच दरम्यान इंदिरा गांधी यांनी देशाला संबोधित केलं होतं.
त्यामुळे खलिस्तानी चळवळ आणि पंजाबमधील हिंसेकडे सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत असून कठोर कारवाईचा निर्णय घेऊ शकते. त्याचवेळी सरकारने पंजाबकडून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्यांची सेवा बंद केली होती. फोनचे कनेक्शन कट करण्यात आले होते. विदेशी मीडियांना पंजाबमधून बाहेर काढण्यात आलं होतं. सुवर्ण मंदिराचं वीज-पाणी कापण्यात आलं होतं.
Question : What about 1984 riots against the Sikhs?
— Amock_ (@Amockx2022) May 4, 2025
Rahul Gandhi : I was not there in politics that time, but i take responsibility. It was unfortunate.
Modi is not taking responsibility as PM but RaGa apologizing for 1984. 🫡
We need him as Prime Minister 🔥 pic.twitter.com/WnqheqIg5b
अन् अखेर ऑपरेशन ब्लू स्टार राबवले गेले..!
- भारतीय सेनेने 3 जून 1984 रोजी अमृतसरमध्ये जाऊन सुवर्ण मंदिराला घेराव घातला. त्याआधी शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे आणखीनच तणाव वाढला.
- त्याचवेळी 4 जून रोजी लष्कराने गोळीबार सुरू केला. सुवर्ण मंदिरात लपलेल्या कट्टरतावाद्यांकडील शस्त्रांचा अंदाज घेण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. परंतु, कट्टरतावाद्यांनीही गोळीबाराला तोडीसतोड उत्तर दिलं.
- 5 जून रोजी अखेरीस लष्कराने शस्त्र सज्ज गाड्या आणि टँकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 5 जूनच्या रात्री कट्टरतावादी आणि लष्करा दरम्यान प्रचंड गोळीबार झाला.
- मंदिरात 6 जून 1984ला व्यापक अभियान राबवलं गेलं. प्रचंड गोळीबार झाला. भिंडरावालाचा मृतदेह मिळवण्यात सैन्याला यश आलं.
- 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. सैन्य मंदिरात घुसल्याने शीख समुदायात प्रचंड रोष निर्माण झाला. 1 जून ते 10 जूनपर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार सुरू होतं.
भिंडरावालेंनी पंजाब पेटवला
- स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीने जोर धरलेला असतानाच 'दमदमी टकसाल'चे जनरल सिंग भिंडरावाले हे खलिस्तानचे नेते म्हणून उदयास आले. त्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे संपूर्ण पंजाब पेटून उठला होता. याच दरम्यान 1983 मध्ये पोलीस महासंचालक अटवाल यांची पंजाबच्या सुवर्ण मंदिर परिसरात हत्या करण्यात आली.
- पुढे केंद्र सरकारच्या रडारवर आलेले भिंडरावाले अटक टाळण्यासाठी सुवर्ण मंदिरात साथीदारांसह लपले. केंद्र सरकार कधीही कारवाई करू शकणार असल्याचा अंदाज आल्याने सशस्त्र संरक्षणात वावरणाऱ्या भिंडरावालेंनी शस्त्रास्त्र जमवण्याचा प्रयत्नही सुरू केला होता.
- ज्यावेळी खलिस्तानच्या मागणीने जोर धरला होता. त्यावेळी जनरल सिंग भिंडरावाला हे दमदमी टकसालमध्ये शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांची शीख धर्मावर निस्सीम श्रद्धा होती. त्यामुळेच ते शीख समुदायामध्ये अल्पकाळातच लोकप्रिय ठरले.
- टकसालच्या गुरुच्या मृत्यूनंतर भिंडरावाले वयाच्या अवघ्या 31व्या वर्षीच शिखांच्या पाच अकाल तख्तांपैकी एक असलेल्या 'दमदमी टकसाल'चे अध्यक्ष बनले. त्यांना धर्म गुरुचा दर्जा प्राप्त झाला.
- त्यांचा लोकांवर प्रचंड प्रभाव होता. त्यांनी सांगितल्याबरोबर लोक सिगारेट, दारू पिण्यासह मांस खाणे सोडून देत होते. भिंडरावाले नेहमीच शिखांच्या पारंपारिक वेषात असायचे.












Click it and Unblock the Notifications