PM किसान योजनेचे पैसे दुप्पट होणार?; कृषी राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली मोठी माहिती
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेची वार्षिक रक्कम ₹6,000 वरून ₹12,000 केली जाणार, अशा सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. केंद्र सरकारने सध्या तरी ही रक्कम दुप्पट करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की केंद्र सरकार योजनेची वार्षिक रक्कम वाढवणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये एका संसदीय स्थायी समितीने शेतकऱ्यांना वर्षाला ₹12,000 देण्याची शिफारस केली होती. याच अनुषंगाने, खासदार समीरुल इस्लाम यांनी आज राज्यसभेत या मुद्द्यावर सरकारकडून उत्तर मागितले.
रकमेत वाढ होणार नाही
या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, "सरकार सध्या अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाहीये." याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, PM-Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक ₹6,000 ची मदत तूर्तास तरी कायम राहणार आहे. त्यामुळे योजनेची रक्कम दुप्पट होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
किसान आयडी अनिवार्य कधी?
खासदार समीरुल इस्लाम यांनी योजनेच्या हप्त्यांसाठी 'किसान आयडी' (Kisan ID) नोंदणी करणे अनिवार्य आहे का, असा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता.
यावर बोलताना राज्यमंत्री ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली:
- किसान आयडी फक्त नवीन नोंदणीसाठी आवश्यक आहे.
- हा आयडी संपूर्ण देशभरात अनिवार्य नाही.
- ज्या १४ राज्यांमध्ये शेतकरी नोंदणी तयार करण्याचे काम आधीच सुरू झाले आहे, तिथे हा आयडी आवश्यक आहे.
- मात्र, ज्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली नाही, तेथील शेतकरी किसान आयडीशिवायही योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करू शकतात.
PM किसान योजना थोडक्यात
२०१९ मध्ये सुरू झालेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे वर्षाला ₹6,000 जमा केले जातात. ही रक्कम ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications