'मोदीजी, मला एक सुसाइड बॉम्ब द्या, मी पाकिस्तानात ...', मंत्री जमीर खान यांचे विधान व्हायरल
Zameer Ahmed Khan: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे पाकिस्तान भीतीच्या छायेत जगत आहे. दरम्यान, कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री जमीर अहमद खान यांचे एक विधान व्हायरल झाले आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी परवानगी दिली तर ते स्वतःला आत्मघातकी बॉम्ब बांधून शेजारील देशाशी युद्ध करण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले आहेत.
2 मे रोजी कर्नाटकात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जमीर अहमद खान यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि या हल्ल्याला "निर्दयी आणि अमानवीय कृत्य" असे संबोधले. त्यांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोन कर्नाटकातील नागरिकांसह सर्व पीडितांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, त्यांच्या पुढील वक्तव्याने ते चर्चेत आले आहेत. खान म्हणाले, "पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे.

आम्ही भारतीय, हिंदुस्तानी आहोत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मला परवानगी देतील, तर मी सुसाइड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जायला तयार आहे. मी तो बॉम्ब माझ्या शरीराला बांधून पाकिस्तानवर हल्ला करेन." तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की मी देशासाठी आपला जीव द्यायला तयार आहे आणि केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी.
Just Zameer anna thing: Karnataka Minister Zameer Ahmed says, 'Give me a suicide bomb, I will go to Pakistan.' pic.twitter.com/EMrB2zyxzs
— Harish Upadhya (@harishupadhya) May 3, 2025
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून पर्यटकांनवर गोळ्या घातल्याचे समोर आले आहे. हा हल्ला 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली.
या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनेही अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवल्या नाहीत. पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ज्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. भारताने कठोर पावले उचलत 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटूंची चॅनेल्स समाविष्ट आहेत. तसेच, पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इन्स्टाग्राम खाती भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत. मुंबईत अल्पकालीन व्हिसावर आलेल्या 15 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले.
पाकिस्तान विरुध्द भारत सरकारने उचलली कठोर पावले
- सिंधू पाणी करार रोखण्यात आला.
- अटारी सीमेवरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
- पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले. 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश
- पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद केले जाईल तसेच भारतातील पाकिस्तानी दूतावास देखील बंद करण्याचा निर्णय झाला.पाकिस्तानी राजदूतांनी 7 दिवसांच्या आत देश सोडावा.
- पुढील निर्णय होईपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय व्हिसा मिळणार नाही.












Click it and Unblock the Notifications