बिहारमध्ये मोठा उलटफेर होण्याची चर्चा; बडा नेता केंद्रात ?
लोकसभा निवडणुकीचे निकाल तोंडावर आले असतानाच नव्या राजकीय मांडणीची चर्चा होऊ लागली आहे. राज्या राज्यातील काही नेते केंद्रात जाणार असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यातील पोकळी भरून काढण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधि दिली जाणार आहे.
भाजपने या लोकसभा निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले. राज्यात कारकीर्द गाजवलेल्या मंत्र्यांना लोकसभेचे तिकीट दिले तर काही केंद्रिय मंत्र्यांना विधानसभेत पाठवले. मध्य प्रदेशमध्ये चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले.

नितीश कुमार नरेंद्र मोदी यांची भेट
बिहारमध्येही असेच काहीसे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्याशी चर्चा केली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार हे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार असून त्यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तअसे झाल्यास ही एक मोठी राजकीय घडामोड ठरणार आहे.
नितीश भाजप युती
नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि भाजप यांची बिहारमध्ये युती आहे. मात्र त्यांनी भाजपशी युती तोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षासोबत सत्ता स्थापन केली होती. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा नितीश आणि भाजप यांची युती होती.
नितीश कुमार यांच्या भूमिकांत बदल
भाजपपेक्षा कमी जागा मिळूनही नितीश यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र काही महिन्यांतच त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत घरोबा केला. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव ही नितीश यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले.
इंडिया आघाडीचे सूत्रधार
भाजपविरोधात सर्वपक्षीय एकजूट निर्माण करण्यासाठी नितीश कुमार यानीच पुढाकार घेतला. स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र कॉँग्रेसने त्यांच्या अपेक्षेकडे कानाडोळा केल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.
त्यातच तेजस्वी यादव यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. आणि एके दिवशी अचानक त्यांनी पुनः भाजपसोबत सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीत ही दोन्ही पक्ष एकत्र लढले.
आता लोकसभा निवडणुकीनंतर नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यांच्या गाठीभेटीमधून तसे संकेत मिळत आहेत. नितीश केंद्रात जाऊन भाजपला बिहारचे मुख्यमंत्रीपद मिळाल्यास प्रथमच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे.












Click it and Unblock the Notifications