काय सांगता..? पिंटू नावाड्याने कुंभमेळ्यात कमावले 30 कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक
प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ नुकताच संपन्न झाला. ४५ दिवस चाललेल्या या भव्य कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. या कुंभमेळ्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली. या कुंभमेळ्यात जशी विक्रमी गर्दीची चर्चा झाली तशीच चर्चा विक्रेत्यांचीही झाली. चहा, टूथस्टिक्स आणि इतर वस्तू विकून अनेकांनी भरपूर पैसे कमवले. याच कमाईच्या कहाणीत सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे नैनीच्या अरेल भागातील रहिवासी पिंटू मल्लाह. पिंटूने त्याच्या बोटींद्वारे ४५ दिवसांत ३० कोटी रुपये कमावले.

कोण आहे पिंटू मल्लाह
पिंटू मल्लाह हा नैनीतील नावाड्या आहे. याच नावाड्याच्या कमाईचे सध्या सर्वात जास्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे कुंभमेळ्यापूर्वी बोट खरेदी करण्यासाठी पिंटूने आपल्या आईचे दागिने गहान ठेवले होते. दागिने गहाण ठेऊन त्याने बोट घेतली होती. पिंटूच्या परिवारात तब्बल १०० सदस्य आहेत. या सर्वांनी मिळून आईच्या दागिन्यांच्या पैशातून १३० बोटी खरेदी केल्या. त्याच बोटीद्वारे त्यांनी आपल्या आयुष्याची आर्थिक नाव पैलतिरावर नेली.
आईला होती दागिन्यांची चिंता
पिंटूने १३० बोटी तयार करण्यासाठी आईकडून दागिने घेतले. ते गहाण टाकले. परंतु सुरुवातीला त्याच्या आईला ही गुंतवणूक वाया जाईल की काय, अशी चिंता होती. पण जेव्हा कुंभमेळा यशस्वीरित्या संपला आणि बोटींना मोठा नफा झाला तेव्हा ती देखील खूप आनंदी झाली. या यशाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
कुटुंबाने ३० कोटी रुपये कमावले
महाकुंभमेळ्यात पिंटू मल्लाहच्या कुटुंबाने ३० कोटी रुपये कमावले. जो आकडा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. परंतु, पिंटू म्हणतो की त्याने व त्याच्या कुटुंबाने ही सर्व कमाई प्रामाणिकपणे केली. जेव्हा त्यांना बोटीच्या भाड्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसार भाडे आकारले. जरी इतर काही खलाशांनी मनमानी भाडे आकारले असेल, तरी त्याच्या कुटुंबाने तसे केले नाही.
दररोज ५०,००० रुपये कमाई
एक बोट तयार करण्याला सुमारे ५०,००० ते ७०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु महाकुंभ मेळ्यात पिंटूच्या एका बोटीने एका दिवसात सरासरी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. याचा हिशोब केला तर, एका बोटीने ४५ दिवसांत सुमारे २३ लाख रुपये कमावले. जेव्हा हा आकडा १३० बोटींवर लागू करण्यात आला तेव्हा एकूण उत्पन्न ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.
मुख्यमंत्र्यांनीही केले कौतूक
या कामगिरीचा उल्लेख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केला. ते म्हणाले की, महाकुंभमेळ्यादरम्यान एका खलाशी कुटुंबाने १३० बोटींमधून ३० कोटी रुपये कमावले. त्याने गणना केली की प्रत्येक बोटीने ४५ दिवसांत २३ लाख रुपये कमावले आणि दररोजची कमाई ५०,००० ते ५२,००० रुपयांपर्यंत होती.












Click it and Unblock the Notifications