रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी सणासुदीची खास भेट;'राउंड ट्रिप'वर 20% सूट, कधी पासून सुविधा लागू होणार?
Indian Railways Round Trip Package Scheme : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे.
आता, तुम्ही जाण्या-येण्याचं 'राउंड ट्रिप' तिकीट एकाच वेळी बुक केल्यास, परतीच्या तिकिटाच्या मूळ भाड्यावर 20% पर्यंत सूट मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होईल. रेल्वेने ही नवी 'राउंड ट्रिप पॅकेज' योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.
ही योजना सध्या काही निवडक मार्गांवर आणि गाड्यांवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश प्रवाशांना आर्थिक फायदा देणे आणि गाड्यांमधील जागांचा प्रभावी वापर करणे हा आहे. जर ही योजना यशस्वी झाली, तर ती देशभरात लागू केली जाईल.

कधीपासून मिळणार ही सूट?
- रेल्वे प्रवाशांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेल्वेची ही खास योजना 14 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.
- जाण्याचे तिकीट : 13 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या तारखांसाठी बुक करावे लागेल.
- परतीचे तिकीट : 17 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 या तारखांसाठी बुक करता येईल.
ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला दोन्ही तिकिटे एकाच वेळी 'कनेक्टिंग जर्नी फीचर' वापरून बुक करणे आवश्यक आहे.
सवलत कशी मिळवायची?
'कनेक्टिंग जर्नी फीचर'चा वापर
तिकीट बुक करताना हे फीचर वापरणे गरजेचे आहे. यामुळे दोन्ही प्रवासांची तिकिटे एकमेकांशी जोडली जातात आणि तुम्ही सवलतीसाठी पात्र ठरता.
सवलत फक्त मूळ भाड्यावर: सूट केवळ परतीच्या तिकिटाच्या मूळ भाड्यावर मिळेल. यात कर आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत.
एकच प्रवाशी
दोन्ही तिकिटे एकाच प्रवाशाच्या नावावर असावी लागतील.
पक्की तिकिटे
जाण्याचे आणि परतीचे दोन्ही तिकीट कन्फर्म असावे.
आरक्षणाचा नियम लागू नाही
परतीच्या तिकिटाच्या बुकिंगसाठी आगाऊ आरक्षणाचा कोणताही विशिष्ट नियम लागू नाही, त्यामुळे प्रवाशी या कालावधीत कधीही तिकीट बुक करू शकतात.
रेल्वेच्या मते, या उपायामुळे सणासुदीच्या काळात दोन्ही बाजूंच्या गाड्यांचा चांगला वापर होईल आणि प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाचा पर्याय मिळेल.
विशेष गाड्यांचीही सोय
सणासुदीच्या गर्दीचा सामना करण्यासाठी रेल्वेने फक्त ही सवलतच जाहीर केली नाही, तर अनेक विशेष गाड्या चालवण्याचीही तयारी केली आहे. यामुळे लांबच्या प्रवासासाठी लागणारी प्रतीक्षा यादी (waiting list) कमी होईल आणि जास्तीत जास्त प्रवाशांना जागा उपलब्ध होईल.
उत्तर भारतातून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बंगालकडे जाणाऱ्या तसेच दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमधून इतर राज्यांकडे जाणाऱ्या मार्गांवर या विशेष गाड्या चालवल्या जातील.
या गाड्यांचे वेळापत्रक लवकरच रेल्वेच्या वेबसाइटवर आणि स्थानकांवर जाहीर केले जाईल. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना स्वस्त प्रवासासोबतच अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल.












Click it and Unblock the Notifications