खामेनींच्या मृत्यूनंतर भारतासाठी 14,000 कोटींचा 'टाइम बॉम्ब'; तुमच्या खिशावर कसा होणार थेट परिणाम?
पश्चिम आशियातील भू-राजकीय समीकरणे एका रात्रीत बदलली आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाची बातमी आणि त्यानंतर इराणच्या शक्तिशाली 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) हाती घेतलेली सत्तेची सूत्रे, यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. वरवर पाहता ही घटना इराणची अंतर्गत बाब वाटू शकते, परंतु जागतिक अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकलेल्या भारतासाठी हा एक मोठा आर्थिक धक्का ठरणार आहे.

भारतासाठी १४,००० कोटींचा धोका
भारत आणि इराणचे ऐतिहासिक संबंध खामेनींच्या काळात स्थिर राहिले होते. मात्र, आता निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी आणि IRGC चा वाढता प्रभाव यामुळे भारताचा इराणसोबतचा सुमारे १.६८ अब्ज डॉलर्स (अंदाजे १४,००० कोटी रुपये) चा व्यापार धोक्यात आला आहे. बासमती तांदूळ, चहा, साखर आणि औषधे यांसारख्या वस्तूंची मोठी निर्यात इराणला केली जाते. जर तेथील लष्करी राजवटीने बँकिंग प्रणाली किंवा बंदरांवर कडक निर्बंध लादले, तर भारतीय निर्यातदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडण्याची दाट शक्यता आहे.
तुमच्या स्वयंपाकघरातील महागाईचा तडाखा
इराणमधील अस्थिरतेचा थेट परिणाम तुमच्या घराच्या बजेटवर होणार आहे.
सुका मेवा आणि फळे: भारतात येणारा पिस्ता, खजूर, किवी आणि सफरचंदांचा मोठा वाटा इराणमधून येतो. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील.
दैनंदिन वस्तू : मालवाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे केवळ आयात केलेल्या वस्तूच नाही, तर स्थानिक बाजारपेठेतील फळे आणि भाज्यांच्या दरातही वाढ होण्याची भीती आहे.
इंधन दर आणि डॉलरचे गणित
भारत जरी सध्या इराणकडून थेट कच्चे तेल खरेदी करत नसला, तरी पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळते.
पेट्रोल-डिझेल: कच्च्या तेलाचे दर वाढल्यास भारतात इंधन महाग होईल. याचा परिणाम मालवाहतुकीवर होऊन दूध, भाजीपाला आणि अन्नधान्य महाग होईल.
रुपयाची घसरण: तेलासाठी अधिक डॉलर्स मोजावे लागल्याने भारतीय रुपया कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे एकूणच महागाई वाढण्यास मदत होईल.
प्रमुख क्षेत्रांवर होणारे परिणाम
शेती आणि निर्यात : इराण हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. लष्करी राजवटीमुळे पेमेंट मिळण्यास उशीर झाल्यास भारतीय शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडू शकते.
औषधनिर्माण (Pharmaceuticals) : भारत मोठ्या प्रमाणावर जीवनरक्षक औषधे इराणला निर्यात करतो. युद्धाच्या सावटाखाली या औषधांचा पुरवठा थांबल्यास भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम होईल.
ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स : जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्चा माल मिळवणे कठीण होईल, परिणामी या क्षेत्रांतील उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.
राजनैतिक आव्हान: इस्रायल-इराण संघर्ष
IRGC ची आक्रमक भूमिका आणि अमेरिका-इस्रायल यांच्याशी असलेला त्यांचा जुना संघर्ष आता तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतासाठी हे एक मोठे 'डिप्लोमॅटिक' आव्हान असेल. चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भविष्य आता इराणच्या नव्या लष्करी नेतृत्वाच्या धोरणांवर अवलंबून आहे.












Click it and Unblock the Notifications