मोठी बातमी ! गुजरातमध्ये पूल कोसळला; अनेक वाहनं नदीत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
गुजरात राज्यातील वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवरील जुना गंभीरा पूल कोसळून भीषण अपघात घडला आहे. हा अपघात बुधवार, 9 जुलै रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास घडला. घटनास्थळी वाहनांची वर्दळ सुरू असतानाच पुलाचा एक भाग कोसळला आणि दोन ट्रक, एक बोलेरो जीप आणि एक इतर वाहन थेट महिसागर नदीत कोसळले.

या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले असून चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, इतर काही नागरिक नदीपात्रात अडकल्याची शक्यता असून शोध व बचाव मोहिम वेगात सुरू आहे.
45 वर्ष जुन्या पुलाची अवस्था होती धोकादायक
महिसागर नदीवरील हा गंभीरा पूल सुमारे 45 वर्षे जुना होता. स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी त्याच्या डागडुजीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण पुलाची दुरवस्था लक्षात घेऊनही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
हा पूल वडोदरा जिल्ह्यातील पदरा तालुका आणि आणंद जिल्ह्याच्या हद्दीला जोडतो, त्यामुळे तो दोन्ही जिल्ह्यांसाठी वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
#WATCH | Vadodara, Gujarat | The Gambhira bridge on the Mahisagar river, connecting Vadodara and Anand, collapses in Padra; local administration present at the spot. pic.twitter.com/7JlI2PQJJk
— ANI (@ANI) July 9, 2025
घटनेचा तपशील आणि बचावकार्य
अपघाताची घटना मुजपूर गावाजवळ घडली. पूल कोसळला तेव्हा वाहनं पुलावरून जात होती. दूध वाहतूक करणारे ट्रक, बोलेरो जीप आणि इतर वाहनं नदीत कोसळली. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
108 आपत्कालीन सेवा, पोलीस, तसेच NDRF आणि SDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यात अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. नदीतील पाणी पातळी जास्त असल्याने बचाव मोहीम अधिक कठीण ठरत आहे.
राजकीय प्रतिक्रिया
या घटनेनंतर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "गंभीरा पूल कोसळून अनेक वाहनं नदीत पडली असून जीवितहानी होण्याची भीती आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घ्यावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करावा."












Click it and Unblock the Notifications