विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचं ठरलं, केंद्रीय नेतृत्वाच्या राज्यातील नेत्यांना सुचना
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी मंगळवारी (१८ जून) राज्यातील भाजप कोअर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत महाराष्ट्रातील पराभवावर चिंतन करण्यात आलं. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील भाजप नेत्यांसोबत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोअर कमिटीला सोबत घ्या, त्यासोबतच यापुढे राज्यात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, अश्या सुचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील,पंकजा मुंडे,आशिष शेलार, रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे आदींनी हजेरी लावली होती.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला रोखायचं असेल,तर भाजपच्या संपूर्ण टीमने एकत्रितपणे काम करायला हवं. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच नव्या- जुन्या नेत्यांनी सक्रीय राहायला हवं,अशा शब्दात केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील नेत्यांना स्पष्ट शब्दात सुचना दिल्या आहेत.आत्तापासूनच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, उमेदवारांना तयारी करायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या,त्या पुन्हा विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ देऊ नका, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे, अश्याच सूचनाच भाजपच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत.
सोशल मीडियाचा पूर्णपणे वापर करा
दिल्लीतील कालच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भातही चर्चा झाली करण्यात आली. सोशल मीडियात विरोधकांनी भाजपविरोधात जे रान उठवलं त्याला प्रत्युत्तर घ्यायला राज्यातील नेते कमी पडल्याचे मत केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केले. तसेच, विरोधकांकडून जे नेरिव्ह तयार करण्यात आलं,त्याला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडले? विधानसभा निवडणुकीत तरी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं सोशल मीडियाचा पूर्णपणे वापर करा,अशा सूचना राज्यातील भाजप नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
भाजपाला 13 जागांवर बसला फटका
2019 च्या तुलनेत युतीच्या 25 जागा या निवडणूकीत कमी झाल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. यामध्ये भाजपला केवळ 9 जागांवर विजय मिळाला असून 2019 च्या तुलनेत भाजपच्या 13 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने मोठी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीकडून जो नेरेटीव्ह सेट करण्यात आला त्यामध्ये मराठा आरक्षण, संविधान बदलणार, कांदा प्रश्न हे मुद्दे विरोधकांनी सक्षमपणे मांडले आणि त्याचा फटका महायुतीला राज्यात झाला असल्याचं वरिष्ठ नेत्यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्यात पक्ष संघटनेत कुठलाही बदल नाही
लोकसभा निवडणूकीत राज्यात भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर राज्यातील नेतृत्वात मोठा बद्दल होणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही,तसेच प्रदेशाध्यक्ष अथवा इतर कोणताही नेतृत्वात बदल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.












Click it and Unblock the Notifications