देशात 24 तासांत 3 मोठया गुन्ह्यांतील एन्काउंटर कसे झाले? जाणून घ्या पोलिसांनी कसा चुकता केला हिशोब
Police Encounter : मागील 24 तासात देशात तीन मोठ्या गुन्हेगारी प्रकरणातील तीन आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले आहेत. यातील एक एन्काउंटर महाराष्ट्रातील असून दोन उत्तर प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रातील बदलापूरमधील एका खाजगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (23) हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला.
उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर दरोडा प्रकरणातील एक आरोपी अनुज प्रताप सिंग हा उन्नावमध्ये यूपी एसटीएफ आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ठार झाला. तर गाझीपूरमध्ये, दोन आरपीएफ जवानांची हत्या करून त्यांचे मृतदेह चालत्या ट्रेनमधून फेकल्याच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद जाहिद, यूपी एसटीएफ आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या तीनही चकमकी आणि त्यांच्याशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणांबाबत जाणून घेऊया.
अक्षय शिंदेचा एन्काउंटर
बदलापूरमध्ये 12 ऑगस्ट रोजी एका खाजगी शाळेत नर्सरीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींच्या पालकांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्या मुलींसोबत शाळेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. अधिकारी त्यांना बदलापूर (पूर्व) पोलिस ठाण्यात घेऊन गेले. 12 ऑगस्ट रोजी दोन्ही मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शालेतील सफाऑई कर्मचारी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध लैंगिक छळाचा एफआयआर नोंदवला. याबाबत लोक रस्त्यावर उतरले. स्थानिक रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. लोकांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान आरोपीला अटक झाली मात्र 23 सप्टेंबर रोजी हा आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. या एन्काउंटरचे अनेकांनी समर्थन केले तर अनेक लोकांना सवाल उपस्थित केला.

अनुज प्रताप सिंग एन्काउंटर
गेल्या महिन्यात 28 ऑगस्ट रोजी काही चोरट्यांनी भरदिवसा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील थाथेरी बाजारातील सराफा व्यापारी भरत सोनी यांच्या ओम ऑर्नामेंटच्या दुकानात घुसून बंदुकीच्या धाकावर 1 कोटी 35 लाख रुपयांचा माल लुटला होता. पोलिसांनी जारी केलेल्या सुलतानपूर दरोडा प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनुज प्रताप सिंग हा दुकानात सर्वप्रथम शिरल्याचे दिसून आले. त्याने सर्वप्रथम ज्वेलर्स भरत सोनी आणि त्याच्या मुलावर पिस्तूल दाखवले. यानंतर अनुजचे चार साथीदार दुकानात घुसले आणि दागिने आणि पैसे बॅगेत भरू लागले.
त्यांच्या टोळीचा म्होरक्या विपिन सिंग असून त्याने काही दिवसांपूर्वी रायबरेली न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. अनुज विपिनच्या सर्वात जवळ होता. दोघांनी मिळून गुजरातमध्येही दरोडा टाकला होता. यूपी एसटीएफने एका निवेदनात म्हटले आहे की - आम्हाला माहिती मिळाली होती की, प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सज्ज अनुज त्याच्या एका साथीदारासह उन्नावच्या गंगा कात्री भागात आला होता आणि रात्री सुलतानपूर ज्वेलरी शॉपमधून लुटलेले दोन्ही दागिने घेऊन मोटरसायकलवरून रायबरेलीला गेले होते
या माहितीवर कारवाई करत, लखनौहून एसटीएफची टीम 22 सप्टेंबर रोजी रायबरेली-उन्नाव महामार्गावरील कोलुहागडा-अचलगंज अंडरपासवर पोहोचली. पथकाने दोन तुकड्यांमध्ये विभागून परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू केला. कोलुहागडाकडून एक मोटारसायकल सुसाट वेगाने येताना दिसली. अनुज सिंग आणि त्याचा सहकारी दुचाकीवर जात असल्याचे एसटीएफ टीमला माहिती देणाऱ्याने सांगितले.
मोटारसायकल थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मोटारसायकल चालकाने कच्च्या रस्त्याकडे वाहन वळविण्याचा प्रयत्न केला. गवत आणि चिखलामुळे तो घसरला आणि पडला. एसटीएफच्या पथकाने आरोपीला आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा अनुज आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला.
डीएसपी प्रमेश कुमार शुक्ला थोडक्यात बचावले. हेड कॉन्स्टेबल रवी वर्मा यांना गोळी लागली, पण बुलेटप्रूफ जॅकेट घातल्यामुळे ते बचावले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अनुज सिंगला गोळी लागली आणि तो रस्त्याच्या कडेला पडला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अनुज प्रताप सिंग आणि मंगेश यादव हे दोघे चकमकीत ठार झाले असून सचिन सिंग, त्रिभुवन कोरी, पुष्पेंद्र सिंग, दुर्गेश सिंग, विनय शुक्ला, अरविंद यादव, विवेक सिंग, अजय यादव आणि विपिन सिंग हे ९ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. . अन्य तीन आरोपी अंकित यादव, फुरकान आणि अरबाज अजूनही फरार आहेत. पोलिसांनी भरत सोनीच्या दुकानातून लुटलेला संपूर्ण माल आधीच जप्त केला होता, ज्यात सुमारे 2.6 किलो सोन्याचे दागिने आणि 15 किलो चांदीचे दागिने होते. 20 सप्टेंबर रोजी व्यापारी भरत सोनी यांचा माल सोडण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार, सुलतानपूर शहर कोतवालीने 15 किलो चांदी आणि 2 किलोपेक्षा जास्त सोने सराफाला सुपूर्द केले होते.
मोहम्मद जाहिद एन्काउंटर
19-20 ऑगस्टच्या रात्री गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये जावेद खान आणि प्रमोद कुमार हे दोन आरपीएफ जवान बेकायदेशीर दारूची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर दोघांचेही मृतदेह चालत्या ट्रेनमधून रुळावर फेकण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय-दानापूर रेल्वे सेक्शनवर वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचे मृतदेह सापडले. या हत्येचे धागे बिहारच्या दारू माफियांशी जोडले गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सहा नराधम गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती, तर मोहम्मद जाहिद नावाचा आरोपी फरार होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले होते की, त्यांनी आधी दोन्ही आरपीएफ जवानांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले, त्यानंतर दोघांनाही चालत्या ट्रेनमधून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
गाझीपूरचे पोलिस अधीक्षक इराज राजा यांनी सांगितले की, मोहम्मद जाहिद पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. या चकमकीची माहिती देताना ते म्हणाले, 'दोन आरपीएफ जवानांच्या हत्येतील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या मोहम्मद जाहिदचा दिलदार नगरजवळील एका ठिकाणी शोध घेण्यात आला.
यूपी एसटीएफच्या नोएडा युनिट, जीआरपी आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला घेरले, त्यादरम्यान त्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामध्ये दोन शिपाई जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल मोहम्मद जाहिदला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अवैध दारू तस्करीत सहभागी असलेल्या इतर अटक आरोपींची पोलीस चौकशी करत असून या तस्कर टोळीत आणखी कोणाचा हात आहे, याचा शोध सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications