औरंगजेबच्या कबरीचा वाद संयुक्त राष्ट्रसंघात! कबरीला कायदेशीर संरक्षण देण्याची कुणी केली मागणी? वाचा
Aurangzeb Tomb Controversy : महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब आणि त्याची कबर हा मुद्दा गेल्या एक वर्षापासून गाजत आहे. अशातच औरंगजेबाची खुलताबादेत असलेली कबर आणि ती उखडून टाकण्याची झालेली भाषा यातून नागपूरमध्ये दंगलही उसळली होती.
महाराष्ट्रात या मुद्यावरुन राजकारण होत आहे. राजकीय पक्षांनीही औरंगजेबाच्या कबरीच्या वादात उडी घेतली, त्यामुळे हा मुद्दा पेटतच राहीला. खुलेआम भाषण करुन औरंगजेब आणि त्याचे उद्दात्तीकरण यावर राजकीय पक्षांनी आपला अजेंडाही राबवला होता.

संयुक्त राष्ट्राला लिहिले पत्र
आता औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात गेला आहे. शेवटचा मुघल वंशज बहादूरशहा जफर यांचा वंशज असल्याचा दावा करणारे याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांना पत्र लिहून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद आहे. ते हेच खुलताबाद आहे, जिथे भद्रा मारुतीचे देवस्थान आहे आणि या गावाला रत्नपूर हे नाव द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. अशा या गावात औरंगजेबाची कबर असल्याने काही संघटनाही ही कबर हटवण्यासाठी आक्रमक झाल्या होत्या. त्याच धर्तीवर कबर हटवावी म्हणून मागणीही वाढत होती. काहींनी ही कबर उखडून टाकण्याची भाषाही केली होती, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या कबरीला संरक्षण पुरवले.
काय म्हटले संयुक्त राष्ट्राला दिलेल्या पत्रात?
याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांना पत्र लिहिले व त्यात दावा केला आहे की, औरंगजेबची कबर असलेली जागा वक्फच्या मालकीची आहे. या कबरीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा आहे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा 1958 या कायद्यानुसार, संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. संरक्षित केलेल्या स्मारकाजवळ कोणतेही अनाधिकृत बांधकाम, बदल किंवा उत्खनन करता येणार नाही तसे केल्यास ते दंडनीय असेल तसेच युनेस्को कराराचा भारताने केलेल्या उल्लेखाचाही तुसी यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
कबर हटवता येणार नाही - देवेंद्र फडणवीस
औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात भाष्य केले होते. मिडिया रिपोर्टनुसार, औरंगजेबची कबर हटवता येणार नाही, आपल्याला आवडो किंवा नाही पण ही गोष्ट करता येणार नाही कारण या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिले आहे. तेथून कबर हटवता येणार नाही. मात्र, औरंगजेबचे उद्गात्तीकरण मान्य करता येणार नाही असे फडणवीस म्हणाले होते.












Click it and Unblock the Notifications