भारत-पाक युद्ध झाले तर कुणाची ताकद किती? लष्कर, वायुसेना, नौदलात कोण आहे सरस? वाचा इत्यंभूत माहिती
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. या दोन्ही देशांत युद्धजन्य स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही देशांची लष्करी ताकद किती आहे, याची चर्चा सुरु झाली. आर्मी, नौदल आणि वायुसेना या तिन्ही प्रकारात या दोन्ही देशांकडे किती सैन्य आहे, हे आपण पाहूयात...

पाकिस्तान घाबरलाय का?
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी आरटीएफने घेतली. ही एक पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे भारत आपल्यावर कधीही हल्ला करु शकतो, याची भनक पाकिस्तानला आहे. या हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचे पाकिस्तान म्हणाले असले तरी, पाकिस्तानी हवाई दलाच्या हालचालींबद्दल अनेक दावे केले जात आहेत. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील भागात नियंत्रण रेषेवर हायअलर्ट जारी केला आहे.
पाकिस्तान पाॅवरमध्ये कुठे आहे?
जगातील प्रत्येक देशातील सैन्याची ताकद ग्लोबल फायरपाॅवर मोजत असते. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सच्या मतानुसार गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची लष्करी ताकद सातत्याने कमी होत आहे. २०२३ मध्ये पाकिस्तान जगात ७ व्या क्रमांकावर होता. २०२४ मध्ये तो ९ व्या स्थानावर घसरला. त्यानंतर २०२५ मध्ये तो टॉप १० मधून बाहेर पडला आहे. जगातील इतर देशांचा विचार केला तर पाकिस्तान १२ व्या स्थानावर पोहोचला आहे.
भारत कितव्या स्थानावर?
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सच्या मतानुसार भारत लष्करी ताकदीबाबत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. २०२५-२६ मध्ये भारताचे संरक्षण बजेट ६.८ लाख कोटीपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षीपेक्षा यवर्षी त्यात ९.५% वाढ झाली. तर पाकिस्तानचे बजेट २,२८१ अब्ज रुपये आहे. जे यावर्षी १५९ अब्ज रुपयांनी वाढवण्यात आले आहे.
सैन्याची ताकद कशी आहे?
जमिनीवरील सैन्याची तुलना केल्यास भारत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. भारताकडे १४.५५ लाख सक्रिय सैनिक असून याबाबत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडे राखीव सैन्यदल सुमारे ११.५५ लाख आहे. हेच पाकिस्तानबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे फक्त ६.५४ सक्रिय सैनिक आणि फक्त ५.५ लाख राखीव सैन्य आहे. निमलष्करी दलाचा विचार केला तर भारतात सुमारे २५.२७ लाख निमलष्करी दल आहे. पाकिस्तानकडे फक्त ५ लाख निमलष्करी दल आहेत.
युद्धवाहनांत भारत कुठे आहे?
भारताकडे ४,२०१ रणगाडे आहेत. त्यात टी-९० भीष्म आणि अर्जुन सारख्या प्रगत रणगाड्यांचा समावेश आहे. पाकिस्तानकडे त्याच्या निम्मे म्हणजे सुमारे २,६२७ रणगाडे आहेत. ज्यात अल-खालिद, टी-८०यूडी आणि अल-जरार यांचा समावेश आहे. भारताकडे १,४८,५९४ चिलखती वाहने आहेत. तोफखान्याचा व इतर युद्ध सामुग्रीचा विचार केला तर पाकिस्तान भारतापुढे कोठेच टिकणार नाही.
हवाई दलाची स्थिती काय?
भारताकडे एकूण २,२२९ विमाने आहेत. पाकिस्तानकडे त्याच्या निम्मे म्हणजे १,३९९ विमाने आहेत. भारताकडे ५१३ लढाऊ विमाने आहेत, तर पाकिस्तानकडे ३२८ लढाऊ विमाने आहेत. भारताकडे ६ आणि पाकिस्तानकडे ४ हवाई रणगाडे आहेत. भारताच्या हवाई दलात सुखोई, राफेल, मिराज सारखी आधुनिक लढाऊ विमाने आहेत. तर पाकिस्तान जेएफ-१७ थंडर, एफ-१६ आणि मिराज ही लढाऊ विमाने आहेत.
समुद्री ताकद किती आहे?
भारताचे नौदल समुद्राच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करू शकते. भारताकडे दोन विमानवाहू जहाजांसह एकूण २९३ जहाजे आहेत. भारताचे नौदल पाकिस्तानपेक्षा खूप मोठे आणि प्रगत आहे. भारताकडे १८ पाणबुड्या आहेत. पाकिस्तानचा विचार केला तर त्यांच्याकडे फक्त ८ पाणबुड्या आहेत. पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही.












Click it and Unblock the Notifications