सावधान! 'निपाह' विषाणू शरीरात 45 दिवसांपर्यंत राहू शकतो सुप्त; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय
Nipah virus symptoms : कोरोनाच्या सावटातून जग बाहेर पडत असतानाच आता 'निपाह' (NiV) या जीवघेण्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाहच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
हा विषाणू केवळ प्राण्यांकडून मानवांत पसरत नाही, तर मानवाकडून मानवाकडेही त्याचा प्रसार वेगाने होतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या विषाणूचा मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत आहे, जो कोविड-१९ पेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे.

1. शरीरात 45 दिवस राहू शकतो 'शांत' : उष्मायन कालावधी
- निपाह विषाणूचा सर्वात भयावह पैलू म्हणजे त्याचा 'सायलेंट' राहण्याचा काळ. तज्ञांच्या मते:
- सामान्य कालावधी: लक्षणे दिसण्यासाठी साधारणपणे ४ ते १४ दिवस लागतात.
- सुप्त अवस्था : काही प्रकरणांमध्ये हा विषाणू शरीरात ४५ दिवसांपर्यंत शांत राहू शकतो. या काळात व्यक्तीला कोणताही त्रास जाणवत नाही, परंतु विषाणू आतून शरीरावर हल्ला करण्याची तयारी करत असतो.
२. आजाराचे दोन घातक टप्पे
निपाह संसर्ग प्रामुख्याने दोन टप्प्यांत शरीरावर परिणाम करतो:
टप्पा १ (फ्लूसारखी लक्षणे) : सुरुवातीला तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात. अनेकदा रुग्ण याला सामान्य ताप समजून दुर्लक्ष करतात.
टप्पा २ (मेंदूवर हल्ला) : हा सर्वात धोकादायक टप्पा आहे. विषाणू मेंदूला सूज (Encephalitis) आणतो. यामुळे २४ ते ४८ तासांत चक्कर येणे, गोंधळणे, झटके येणे आणि रुग्ण कोमात जाण्याची शक्यता असते.
३. प्रसार कसा होतो?
हा विषाणू प्रामुख्याने 'फ्रूट बॅट्स' (फळे खाणारी वटवाघळे) यांच्यामुळे पसरतो.
दूषित फळे : वटवाघळांनी चाखलेली फळे किंवा त्यांनी दूषित केलेला कच्चा खजुराचा रस पिल्याने संसर्ग होतो.
प्राण्यांशी संपर्क : संक्रमित डुकरांच्या संपर्कात आल्यानेही हा प्रसार होतो.
मानवी साखळी : संक्रमित व्यक्तीच्या लाळ, घाम किंवा इतर शारीरिक द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्यास दुसऱ्या व्यक्तीला बाधा होते.
४. उपचार आणि आव्हाने
दुर्दैवाने, निपाह विषाणूवर अद्याप कोणतीही ठोस लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही.
उपचार : रुग्णालयात केवळ लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. गंभीर रुग्णांना त्वरित व्हेंटिलेटर किंवा आयसीयू सपोर्टची गरज लागते.
दीर्घकालीन परिणाम : जे रुग्ण या आजारातून वाचतात, त्यांना भविष्यात फिट्स (झटके) येणे किंवा मानसिक बदलांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
५. प्रतिबंधात्मक उपाय: स्वतःचा बचाव कसा करावा?
सध्याच्या परिस्थितीत घाबरून न जाता खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय आहे.
फळे धुवूनच खा : बाजारातून आणलेली फळे स्वच्छ धुवा. ज्या फळांवर पक्षांच्या चोचीचे निशाण किंवा ओरखडे आहेत, ती चुकूनही खाऊ नका.
कच्चा रस टाळा : झाडावरून काढलेला कच्चा ताडी किंवा खजुराचा रस पिणे टाळा.
हात स्वच्छ ठेवा : बाहेरून आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवा.
संपर्क टाळा : वटवाघळांचे वास्तव्य असलेल्या जुन्या विहिरी किंवा गुहांपासून दूर राहा.












Click it and Unblock the Notifications