'अजित दादा माझ्या धाकट्या भावासारखे होते'; घातपात असेल तर सत्य समोर येईलच-नाना पाटेकर
Nana Patekar reaction Ajit Pawar accident : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
"अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर ते माझ्या धाकट्या भावासारखे आणि जवळचे मित्र होते," अशा शब्दांत नानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, अजित पवारांच्या अपघाताबाबत निर्माण झालेल्या संशयावरही नाना पाटेकरांनी स्पष्ट भूमिका मांडली.

"रोहितच्या मनातील प्रश्नांचे निराकरण व्हायला हवे"
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त करत हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात विचारले असता नाना पाटेकर म्हणाले की, "रोहित पवारांनी आपला काका गमावला आहे. अशा वेळी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निराकरण होणे गरजेचे आहे." "जर हा खरोखरच घातपात असेल, तर तो तपासात सिद्ध होईलच. एकदा का सत्य समोर आले आणि कोणी दोषी आढळले, तर त्यांना कायद्यानुसार कडक शिक्षा व्हायलाच हवी."
#WATCH | Mumbai | On the demise of former Maharashtra Deputy CM Ajit Pawar, Actor Nana Patekar says," We are saddened by it (demise of Ajit Pawar)....It all depends on the two parties (the merger of two factions of the NCP)...I knew him since he was 19-20 years old and had… pic.twitter.com/EIyWkbMMMA
— ANI (@ANI) February 12, 2026
२० वर्षांची मैत्री आणि प्रवासाची आठवण
अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना नाना भावूक झाले. ते म्हणाले, "मी दादांना तेव्हापासून ओळखतो जेव्हा ते केवळ १९-२० वर्षांचे होते. एका साध्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. राजकारण बाजूला ठेवले तरी आमची वैयक्तिक मैत्री घट्ट होती. मी त्यांना आयुष्यभर मिस करेन."
सुनेत्रा पवारांवरील जबाबदारीबद्दल नानांचे मत
अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवारांनी आता उपमुख्यमंत्रीपदाची आणि राजकीय वारशाची जबाबदारी स्वीकारली आहे. यावर भाष्य करताना नाना म्हणाले की, सुनेत्रा वहिनींचे दुःख हे शब्दांपलीकडचे आहे, ते त्यांनाच सहन करावे लागेल. पण आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्या हा पदभार समर्थपणे सांभाळतील, असा मला विश्वास आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना निश्चितच थोडा वेळ लागेल.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मौन
सध्या राज्याच्या राजकारणात 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार' अशा चर्चांनी जोर धरला आहे. या विषयावर नानांना छेडले असता त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. "विलीनीकरणाचा निर्णय हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. तो सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. मला निर्णय घेता आला असता तर मी नक्की सांगितले असते, पण सध्या त्यावर भाष्य करणे योग्य नाही," असे म्हणत त्यांनी राजकीय प्रश्नांना बगल दिली.












Click it and Unblock the Notifications