मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! अष्टपैलू अभिनेता-दिग्दर्शक रणजीत पाटील यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन
Ranjit Patil Death News : मराठी मनोरंजन विश्वासाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद ठरला आहे. आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे तरुण दिग्दर्शक आणि अभिनेते रणजीत पाटील यांचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून, एका उमद्या कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

निधनाचे कारण आणि पार्श्वभूमी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रणजीत पाटील यांना गेल्या काही महिन्यांपासून हृदयाशी संबंधित तक्रारी जाणवत होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
मात्र, राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
'जर तरची गोष्ट' आणि यशस्वी कारकीर्द
रणजीत पाटील हे सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाच्या माध्यमातून रणजीत यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची पुन्हा एकदा चर्चा झाली होती.
केवळ दिग्दर्शनच नव्हे, तर अभिनयातही त्यांनी आपली छाप सोडली होती. झी मराठी वाहिनीवरील 'हृदय प्रीत जागते' या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
तरुण रंगकर्मींचे मार्गदर्शक
रणजीत पाटील यांचे शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध रुईया महाविद्यालयात झाले होते. रुईयामधील एकांकिकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण कलाकारांना घडवले, त्यांना प्रोत्साहन दिले आणि योग्य मार्गदर्शन केले. प्रायोगिक रंगभूमीपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता.
सिनेसृष्टीतून श्रद्धांजली अर्पण!
रणजीत पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
"एक अभ्यासू दिग्दर्शक आणि चांगला माणूस गमावला", अशा शब्दांत कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनामुळे तरुण कलाकारांचा एक मोठा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications