50 कोटींची कमाई करूनही, सनी देओलच्या 'बॉर्डर-2' फिल्मचे होणार मोठे नुकसान, हे आहे कारण?
Border 2 Gulf Ban : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर -2' सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा सिक्वेल असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानशी संबंधित संवेदनशील कंटेंटमुळे आखाती देशांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे.

आखाती देशांत प्रदर्शनावर बंदी: काय आहे कारण?
मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यपूर्वेतील प्रमुख देशांनी 'बॉर्डर २' ला आपल्या देशात प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारली आहे. यामध्ये खालील देशांचा समावेश आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE).
या देशांमधील सेन्सॉर बोर्डाच्या नियमांनुसार, ज्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानविरोधी भाष्य असते किंवा संवेदनशील राजकीय संदर्भ असतात, त्यांना प्रदर्शनाची अनुमती दिली जात नाही. 'बॉर्डर २' ची कथा भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने, येथील सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवा कंदील देण्यास नकार दिला आहे.
कोट्यवधींचे आर्थिक नुकसान
आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक स्थायिक आहेत. बॉलिवूड चित्रपटांसाठी ही एक मोठी बाजारपेठ मानली जाते. 'बॉर्डर २' सारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाला या देशांतून किमान ५० कोटी ते १०० कोटी रुपयांच्या कमाईची अपेक्षा होती. मात्र, आता ही कमाई पूर्णपणे बुडण्याची शक्यता आहे.
चित्रपटाच्या टीमने ही बंदी उठवण्यासाठी आणि सेन्सॉर बोर्डाची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु प्रदर्शनासाठी कमी वेळ शिल्लक असल्याने आता शेवटच्या क्षणी यश मिळण्याची शक्यता धूसर आहे.
'धुरंधर'च्या पावलावर पाऊल?
विशेष म्हणजे, आखाती देशांत बंदी घातली जाणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट नाही. यापूर्वी रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' चित्रपटालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 'धुरंधर'वर बंदी आल्यामुळे निर्मात्यांना सुमारे ९० कोटी रुपयांचा फटका बसला होता.
त्यावेळी 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन'ने (IMPPA) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. अशा प्रकारच्या बंदीमुळे निर्मात्यांच्या 'सर्जनशील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर' गदा येते, अशी भूमिका चित्रपट सृष्टीकडून मांडली जात आहे.
निर्माते का आहेत निर्भय?
एकीकडे परदेशातील बाजारपेठ हातातून जात असली, तरी 'बॉर्डर २' चे निर्माते फारसे चिंतेत दिसत नाहीत. त्यांच्या आत्मविश्वासाची दोन प्रमुख कारणे आहेत:
देशांतर्गत प्रतिसाद : भारतात सनी देओलची जबरदस्त क्रेझ आहे. 'गदर २' च्या यशानंतर 'बॉर्डर २' कडून बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाईची अपेक्षा आहे. भारतातून होणारा नफा परदेशातील तोटा भरून काढेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे.
मागील अनुभव : 'धुरंधर' चित्रपटावर बंदी असूनही त्या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली होती. तोच कित्ता 'बॉर्डर २' गिरवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications