धीर सोडू नका... आमिर खान व किरण रावने केले संतोष देशमुख कुटुंबाचे सांत्वन, मस्साजोग येथे...
बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 105 दिवस पूर्ण झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. ९ डिसेंबरला त्यांची हत्या करण्यात आली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक आरोपी अटकेत आहेत. त्यांच्यावर खटलाही सुरु आहे. आता दिवगंत संतोष देशमुखांच्या मुलाची अभिनेता आमिर खानने आज भेट घेतली. ही भेट पुण्यात झाली. या भेटीदरम्यान आमिर खान भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

पुण्यात झाली भेट
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेतली. यावेळेस संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखसुद्धा होते. आमिरने या दोघांचंही सांत्वन केलं. या भेटीदरम्यान आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याकडून भावाच्या हत्येची माहिती घेतली. सर्व घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर आमिर खान भावूक झाला. त्यानंतर आमिरने सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख याला कडाडून मिठी मारली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
अमिरच्या पत्नीनेही दिला सल्ला
आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी तसेच चित्रपट दिग्दर्शिका किरण राव याही यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना, 'हिंमत कायम ठेवा' असा सल्ला दिला. त्यावर आमिरनेही 'होय' असं म्हणत किरण यांच्या सल्ल्याशी आपण सहमत असल्याचं दर्शवले. या दोघांनीही देशमुख कुटुंबाशी गप्पा मारल्या.
'नाम' 'पाणी' फाउंडेशन एकत्र
सध्या मस्साजोग गावात आमिर खानच्या नेतृत्वाखालील 'पाणी' फाउंडेशन आणि अभिनेते नाना पाटेकर तसेच मकरंद अनासपुरे यांच्या नेतृत्वाखालील 'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचे काम सुरू आहे. मस्साजोग गाव पाणीदार करण्यासाठी 'नाम' आणि 'पाणी' फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतानाच या गावातील तरुणांसाठी उभा राहणारा संतोष देशमुखसारख्या हुशार आणि कष्टाळू सरपंचाबरोबर काय काय घडलं हे ऐकून आमिरही अस्वस्थ झाल्याचं बालेवडीतील भेटीदरम्यान दिसून आलं.
वाल्मिक कराडला अटक
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य काही आरोपींना अटक कऱण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास व सुनावणी सुरु आहे. खंडणीला विरोध केल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.२२ मिनिटांनी सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडववले. त्यानंतर काळ्या जीप व कारमधून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना चिंचोली टाकळी शिवावर आणण्यात आले. त्यानंतर लोखंडी राँड, गॅप पाईप, क्लच वायर व काठीचा वापर करुन सरपंच देशमुख यांना बेदम मारहाण करुन त्यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून आरोपींनी पळ काढला होता.












Click it and Unblock the Notifications