शेअर बाजारात होणार घसरगुंडी? अर्थ मंत्रालयाने केलेय सावध
मागील काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतो; अन्यथा पश्चात्तापाताची वेळ येते. ही वेळ येऊ नये यासाठी अर्थ मंत्रालयाने आपल्या मासिक आर्थिक आढावा अहवालातून गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. जागतिक शेअर बाजारात मंदीचं सावट आहे, आणि याचा भारतीय बाजारावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत जागतिक स्तरावर बाजारात मोठी घसरण होऊ शकते, असा धोका मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अहवालात नमूद केलं आहे की, अमेरिका आणि चीनसारख्या प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांतील मंदीमुळे जागतिक शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशिया आणि युरोपमधील युद्धजन्य परिस्थिती आणि यामुळे वाढलेला भू-राजकीय तणावदेखील शेअर बाजारातील अस्थिरतेचं प्रमुख कारण आहे.

आर्थिक धोरणांमधील बदलांचं परिणाम
काही देशांनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत. या धोरणात्मक बदलांमुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर होत असून, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होऊ शकतो. मंत्रालयाने गुंतवणूकदारांना यामुळे अधिक सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम
देशातील आर्थिक परिस्थिती सध्या स्थिर असली तरी काही क्षेत्रांमध्ये आव्हानं दिसून येत आहेत. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. तसंच NielsenIQ च्या अहवालात एफएमसीजी क्षेत्रात मंदीचं संकेत देण्यात आलं आहे.
तथापि, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, खरीप पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ, आणि रब्बी पिकांसाठी पुरेशी पाण्याची उपलब्धता या काही सकारात्मक बाबी आहेत, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळण्याची अपेक्षा आहे.
गुंतवणूकदारांसाठी इशारा
अर्थ मंत्रालयाने गुंतवणूकदारांना आवाहन केलं आहे की, जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर असल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. पुढील काही दिवसांत घसरणीची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications