विझिंजम बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन; अदानी समूहाची 16,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा
'एपीएसईझेड' (APSEZ) द्वारे ३०,००० कोटी रुपयांच्या निधीतून साकारला जाणारा विझिंजमचा दुसरा टप्पा, २०२९ पर्यंत बंदराची क्षमता १ दशलक्ष टीईयूवरून ५.७ दशलक्ष टीईयूपर्यंत वाढवेल, यामुळे केरळ जागतिक ट्रान्सशिपमेंट केंद्र म्हणून अधिक मजबूत होईल आणि भारतात बंदर-आधारित आर्थिक विकासाचे प्रदर्शन घडवेल.
Vizhinjam Port Phase 2 kerala : केरळच्या सागरी आणि आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन शुक्रवारी, 24 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. हा प्रकल्प' अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड' (APSEZ) द्वारे १६,००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीसह विकसित केला जात आहे, यामुळे एकूण गुंतवणूक ३०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, 'एपीएसईझेड'चे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी हा दिवस केरळ आणि भारताच्या सागरी भविष्यासाठी ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की, विझिंजम हे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक'मालवाहतुकीचे हस्तांतरण' केंद्र आणि भारताच्या बंदर-आधारित विकास धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ बनणार आहे.
या समारंभाला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, संसद सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
करण अदानी यांनी अधोरेखित केले की, "विझिंजम प्रकल्प विविध सरकारांच्या राजकीय दूरदृष्टीचे सातत्य दर्शवतो आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या मूलभूत भूमिकेची दखल घेतली, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरुवातीला मंजूर झाला होता." करण अदानी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सातत्याने मिळत असलेल्या सहकार्याची प्रशंसा केली आणि सांगितले की, "अशा मोठ्या ग्रीनफिल्ड पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राजकीय स्पष्टता आणि प्रशासकीय बांधिलकी महत्त्वपूर्ण होती." अदानी यांनी राजकीय नेत्यांनी दिलेल्या द्विपक्षीय पाठिंब्याचेही कौतुक केले आणि म्हटले की, "असे सहकार्य केरळच्या दीर्घकालीन आर्थिक प्राधान्यांबद्दल गुंतवणूकदारांना एक मजबूत संदेश देते."
बंदराच्या कामगिरीबद्दल बोलताना अदानी म्हणाले की, "विझिंजम हे एक दशलक्ष टीईयू (Twenty-foot Equivalent Unit) हाताळणारे सर्वात वेगवान भारतीय बंदर म्हणून उदयास आले आहे. व्यावसायिक कामकाज सुरू झाल्याच्या अवघ्या १५ महिन्यांतच हा टप्पा गाठून केरळला जागतिक शिपिंग नकाशावर ठामपणे स्थान मिळवून दिले आहे. दुसऱ्या टप्प्यामुळे, २०२९ पर्यंत बंदराची क्षमता १ दशलक्ष टीईयूवरून ५.७ दशलक्ष टीईयूपर्यंत वाढेल. एकदा पूर्ण झाल्यावर, विझिंजम हे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे 'मालवाहतूक हस्तांतरण' बंदर आणि देशातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत बंदरांपैकी एक बनेल अशी अपेक्षा आहे."
अदानी म्हणाले की, "हा प्रकल्प केवळ बंदराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार नसून, राष्ट्रीय क्षमतेचा विस्तार आहे तसेच, तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि व्याप्तीच्या बाबतीत विझिंजम हे भविष्यातील भारतीय बंदरांसाठी एक आदर्श ठरेल" असेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या बंदर-आधारित आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, सहकारी संघराज्याचे एक उत्तम उदाहरण म्हणूनही पाहिला जात आहे.
भाषणाच्या शेवटी अदानी यांनी अदानी समूहावर सतत विश्वास ठेवल्याबद्दल केरळ सरकार, केंद्र सरकार, राजकीय पक्ष आणि तिरुवनंतपुरम व केरळच्या नागरिकांचे आभार मानले आणि कंपनी आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करत राहील, असे आश्वासन दिले. https://www.youtube.com/watch?v=ZRl_g_MOogs












Click it and Unblock the Notifications