शेअर बाजारात 'ब्लॅक मंगळवार'! एकाच दिवसात 10 लाख कोटींचा धूर; का कोसळले मार्केट, वाचा 5 कारणं!
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा मंगळवार अत्यंत वेदनादायी ठरला. जागतिक बाजारातील तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या मोठ्या विक्रीमुळे दलाल स्ट्रीटवर रक्ताची चिळकांडी उडाली. सेन्सेक्सने तब्बल १०६५ अंकांची गटांगळी खाल्ली, तर निफ्टीने २५,२०० चा स्तर गाठला. या मोठ्या घसरणीमुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे १०.१२ लाख कोटी रुपये मातीमोल झाले आहेत.

बाजारातील पडझडीची धक्कादायक आकडेवारी
- सेन्सेक्स: १०६५.४७ अंकांनी घसरून ८२,१८०.४७ वर बंद.
- निफ्टी: ३५३.७५ अंकांनी घसरून २५,२३२.५० वर बंद.
- गुंतवणूकदारांचे नुकसान: बीएसईचे एकूण बाजार भांडवल ४६५.६८ लाख कोटींवरून ४५५.७२ लाख कोटींवर आले (१०.१२ लाख कोटींची घट).
- क्षेत्रनिहाय फटका: रिअल इस्टेट क्षेत्र सर्वाधिक ५ टक्क्यांनी कोसळले. आयटी आणि ऑटो क्षेत्रातही मोठी विक्री दिसून आली.
बाजार कोसळण्यामागील ५ प्रमुख कारणे
१. डोनाल्ड ट्रम्प आणि 'टॅरिफ वॉर'ची भीती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांना दिलेल्या धमकीचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. फ्रान्सवर २००% आणि इतर ८ देशांवर १०% टॅरिफ लावण्याच्या घोषणेमुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका भारतीय आयटी क्षेत्राला (IT Sector) बसला.
२. परदेशी गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सातत्याने पैसे काढून घेत आहेत. सलग १० व्या सत्रात त्यांची विक्री सुरू असून, सोमवारीच त्यांनी ३,२६३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
३. 'सुरक्षित' गुंतवणुकीकडे कल (सोनं-चांदीचा विक्रम)
शेअर बाजारात अस्थिरता वाढल्याने गुंतवणूकदार आता सोने आणि चांदीकडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस $४,७०० चा टप्पा ओलांडला आहे, तर चांदीनेही नवा उच्चांक गाठला आहे. इक्विटीमधील पैसा कमॉडिटी बाजारात वळल्याने शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला.
४. आयटी आणि हेवीवेट शेअर्समध्ये मोठी घट
विप्रो, एलटीआयमाइंडट्री (६% घसरण), रिलायन्स, टीसीएस आणि बजाज फायनान्स यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीने निर्देशांकाला खाली खेचले. एचडीएफसी बँक वगळता सेन्सेक्समधील २९ दिग्गज शेअर्स लाल रंगात बंद झाले.
५. जागतिक भावना (Global Sentiment)
युरोप आणि अमेरिकेतील बिघडलेले संबंध आणि वाढलेली महागाईची शक्यता यामुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण आहे, ज्याचे सावट भारतीय बाजारावरही स्पष्टपणे दिसत आहे.
गुंतवणूकदारांसाठी आता काय?
तज्ज्ञांच्या मते, बाजार सध्या 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये आहे, मात्र जोपर्यंत जागतिक स्तरावर टॅरिफबाबत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत अस्थिरता कायम राहू शकते. अशा वेळी घाबरून जाऊन विक्री करण्याऐवजी दर्जेदार शेअर्समध्ये संयमाने टिकून राहणे फायद्याचे ठरू शकते.












Click it and Unblock the Notifications