रोहित पाठोपाठ आता कोहली घेणार टेस्टमधून निवृत्ती? BCCI कडे केली मोठी मागणी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याचा सहकारी विराट कोहलीनेही या फॉरमॅटला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे. विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. तथापि, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विराटला या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे.

'द इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीनुसार, माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अनुभवी खेळाडू आता क्रिकेटच्या दीर्घ स्वरूपात खेळताना दिसणार नाही. "त्याने आपले मन बनवले आहे आणि तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे बोर्डाला कळवले आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा येत असल्याने बीसीसीआयने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. त्याने अद्याप या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही," असे सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले.
काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीचा हा निर्णय आला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती काही दिवसांत भेटणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून कोहली त्याच्या कसोटी भविष्याचा विचार करत होता, जेव्हा त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर खराब कामगिरी केली होती, असे कळले आहे.
जर कोहलीने आपला निर्णय बदलला नाही आणि रोहितही संघात नसेल, तर भारताकडे केएल राहुल, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल आणि त्यानंतर ऋषभ पंत यांच्यासह एक अननुभवी मधली फळी असेल. याशिवाय, संघाला दोन अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणार नाही. डिसेंबर २०१४ मध्ये कोहली आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये रोहित भारताचा कसोटी कर्णधार बनला.
रोहितची टेस्टमधून निवृत्ती
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याचा अलिकडचा फॉर्म चांगला राहिलेला नाही. कसोटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी रोहित एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.
रोहितची कसोटी कारकीर्द कशी राहिली आहे?
कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ११६ डावांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४,३०१ धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत.या फॉरमॅटमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर २१२ धावा आहे. रोहितने २०१३ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध सर्वाधिक १,१४७ धावा केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications