भारत-पाक महामुकाबल्याचे भवितव्य टांगणीला! लाहोरमध्ये 5 तास खलबतं; पुढच्या 24 तासांत होणार फैसला..
India vs Pakistan T20 World Cup 2026: क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा तो केवळ खेळ उरत नाही, तर भावनांचा महापूर येतो. मात्र, २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमधील या हाय-व्होल्टेज सामन्यावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर सोमवारी तब्बल ५ तास चाललेल्या हाय-व्होल्टेज बैठकीने सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आता चेंडू पाकिस्तान सरकारच्या कोर्टात असून, जगातील या सर्वात मोठ्या सामन्याचे नशीब पुढच्या २४ तासांत ठरणार आहे!

लाहोरमध्ये काय घडलं?
वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत तोडगा काढण्यासाठी आयसीसी (ICC) अधिकारी, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी यांच्यात दीर्घ चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान आता थेट बहिष्कार टाकण्याऐवजी 'अटींनुसार तडजोड' करण्याच्या भूमिकेत दिसत आहे. बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने घेतलेल्या कठोर पावलांमुळे हा वाद सुरू झाला असून, आता पाकिस्तान आणि बांगलादेशने एक आघाडी तयार केली आहे.
पाकिस्तानची दुहेरी चाल?
एकीकडे स्वतःच्या तिजोरीत खडखडाट असताना, पाकिस्तान आता 'आम्ही तर बुडूच पण तुम्हालाही घेऊन बुडू' या नीतीचा अवलंब करत असल्याचे दिसत आहे. आयसीसीच्या महसुलात भारत-पाक सामन्याचा वाटा सिंहाचा असतो. हाच महसूल बुडवून आयसीसीवर दबाव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र, जर पाकिस्तानने माघार घेतली, तर त्यांच्यावर आयसीसीच्या कडक निर्बंधांची टांगती तलवार असेल.
पंतप्रधान शहबाज शरीफ घेणार अंतिम निर्णय
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी स्पष्ट केले आहे की, बोर्ड कोणताही अधिकृत निर्णय घेण्यापूर्वी पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा सल्ला घेणार आहे. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या महामुकाबल्याचे भवितव्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications